रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

दहीहंडी, अस्मिता आणि मूर्खपणा...

सध्या काही लोक दहीहंडीचे थर हा हिंदू अस्मितेचा विषय वगैरे असल्याचे सांगत आहेत. त्यासाठी 'कायदा खड्ड्यात' गेला वगैरे फालतूगिरी जोरात सुरु आहे... त्यांच्यापैकी जे सुधारू शकतात अशी अशा आहे त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एकंदर दहीहंडीच्या वादाच्या संदर्भात काही विचार करायला लावणारे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे -
Image Courtesy - DNA India
१. दहीहंडीचे जे मुंबईतील सो कॉल्ड 'विराट' स्वरूप आहे, त्यामागे बहुतेक प्रमाणात खंडणीखोर लोक आहेत, आणि यातील राजकारण, पैसा आणि त्याचे फायदे कोण घेतात हे वेगळे सांगायला नकोच.
२. यापैकी एक 'विराट' संयोजक बाकी वर्षभर 'मनुवाद्यां'च्या विरोधात असले, तरी दहीहंडीच्या वेळी मात्र त्यांच्यात 'कडवा हिंदू' संचारतो, यामागे नक्की काय चमत्कार असावा ?
३. 'स्टुलावर चढून' वगैरे 'शेलक्या' कोट्या करणारे महान नेते, अपंगत्व आलेल्या आणि दुर्दैवी मृत्यू आलेल्या गोविंदांसाठी वर्षभर काय करतात, हा संशोधनाचा विषय आहे...
४. दहीहंडीच्या नावाखाली आपण कोणत्या गुंड प्रवृत्तींना पाठीशी घालतो आहोत, याचे भान असायला हवे.
५. दहीहंडीच्या उत्सवाचे विकृतीकरण करून त्याचे लाभ उठवले जातात, आणि त्याच प्रवृत्तींना हिंदुत्त्ववादी अस्मितेच्या नावावर पाठीशी घालायचे का ?
६. कोर्ट म्हणजेच न्यायसंस्था हा देशाच्या संवैधानिक व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे 'कायदा खड्ड्यात गेला', 'न्यायालयाने नाक खुपसू नये' वगैरे बेजबाबदार प्रतिक्रिया देण्याआधी आपण 'देशाच्या विरोधात' बोलत आहोत याची जाणीव असू द्या. त्यामुळे कन्हैया आणि अफजल गुरुविरुद्ध बोलण्याचा हक्क आपल्याला राहतो का याचाही विचार करावा.
७. जर धर्माचा आणि प्रथेचा प्रश्न असेल ना, तर पौराणिकदृष्ट्या कृष्णाने दहीहंड्या लहानपणी फोडल्या. त्या वीस फुटाच्या वर नसतील. (गवळणी काय दही-दुध-लोणी ५० फूट उंच बांधायच्या का ?) त्यामुळे ९-१० थर हा फालतूपणा धर्माच्या नावाखाली खपवायचे काय कारण ?
८. उरला विषय हिंदू संघटन होते याचा... तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतातील आणि बहुदा जगातील सर्वात मोठे हिंदू किंवा हिंदुत्त्ववादी संघटन आहे. संघाने हे दहीहंडीचे भंपक चाळे केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे हिंदू संघटन वगैरे कारणे देऊ नयेत.
९. या विषयाबाबत बरेच जण, मशिदीच्या भोंग्यांचे आणि उरुसांचे उदाहरण देतात. इथे मुळातच गफलत आहे. जर तुम्हाला धर्माध उच्छाद मान्य नसेल, तर त्याचे प्रत्युत्तर म्हणून आपणसुद्धा तसेच वागायचे का ? जिहादचे उत्तर जिहाद ? असे असेल तर 'हिंदू लादेन' तयार करायचा आहे का ? दुसऱ्याने चूक केली, तिचे प्रत्युत्तर म्हणून आपणही दुप्पट मूर्खपणा करायचा हा कसला डावपेच ?
१०. कोर्टाने दहीहंडीवर बंदी घातली नाही हे लक्षात घ्या.कोर्टाने त्याचे विकृत स्वरूप रोखायचा प्रयत्न केला आहे, आणि त्याचे हिंदू म्हणून खरेतर स्वागत व्हायला हवे.
११. काहीजण 'गाडी चालवताना अपघात होतात म्हणून गाडीच चालवू नये का ?" असा असंबंध तर्क देतात. मात्र दहीहंडी हा 'उत्पादक' (Productive) कार्यक्रम नाही, गाडी चालवणे हा गरजेचा भाग आहे. त्यामुळे शौक म्हणून कोणाचं तरी आयुष्य बरबाद करायचा आपल्याला हक्क असूच शकत नाही. आणि गाडी चालवतानासुद्धा नियम असतात, हेही लक्षात ठेवावे.
१२. शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा... दहीहंडी हा जर क्रीडाप्रकार असेल, तर त्याला साहसी खेळाचे नियम, बंधने व कडक कायदे लागू व्हायला हवेत. जर 'संस्कृती' म्हणून पळवाट काढणार असाल तर मात्र त्यापायी लोकांच्या जीवाशी खेळ करणे चूक आहे.... त्यामुळे जर संस्कृतीच्या नांवाखाली दहीहंडी सुरू ठेवायची तर मात्र वीस फूट किंवा तत्सम बंधने पाळायलाच हवीत. यातील एक काहीतरी मान्य करावे लागणार आहे. एकतर साहसी खेळ म्हणून नियम पाळायचे किंवा संस्कृती असेल तर कायदेशीर बंधने... खेळ आणि संस्कृती यांचा घोळ घालून दिशाभूल करणाऱ्या ढोंगी अस्मिताबाज लोकांपासून सावध राहण्यातच हित आहे.

इथे दहीहंडीच्या आडून चाललेल्या उन्मादाचे आणि त्याच्या मूर्ख समर्थनाचे खंडण करायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. श्रीकृष्ण ही विवेक आणि व्यवहारी तर्कबुद्धीची देवता आहे. त्यामुळे कृष्णाचे नांव घेऊन चाललेल्या या ढोंग आणि उन्मादाचे, श्रद्धा-अस्मितेच्या नावाखाली आंधळे समर्थन केले जाऊ नये, हीच अपेक्षा... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा