विचारसरणी आणि भूमिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विचारसरणी आणि भूमिका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ जून, २०२१

जात, प्रिविलेज आणि गिल्ट!

१. जात ही अक्षरशः जन्मजात म्हणजे By Birth असते.

२. Class सारखी ती बदलता येत नाही, सोडता येत नाही, वर्ण-Race सारखी ती जन्मभर चिकटलेली असते. मी जात मानत नाही असं म्हणून जात संपत नाही.

३. आपण कसा कुठे जन्म घेतो हे आपल्या हातात नसतं. आपल्याला जन्मतः सुदृढ शरीर मिळालं हा जितका योगायोग आहे तितकाच तुमची जातसुद्धा आहे.

४. काही लोक तुम्ही कसेही वागलात, काहीही केलंत, कोणत्याही मूल्यांना मानलंत तरी तुम्हाला "अमुक जातीचाच शेवटी" म्हणून गिल्ट देऊ पाहत असतात.

५. वरीलप्रमाणे वागणारे लोक "कोणीही" असले तरी त्यांना भुंकत फिरणाऱ्या पिसाळल्या कुत्र्यागत तुच्छ आणि हलकट मानावे.

६. तुम्हाला जात असणे म्हणजे तुम्ही जातीयवादी असणे नव्हे. तुम्हाला वर्ण असणे म्हणजे तुम्ही वर्णद्वेषी असणे नव्हे.

७. जी गोष्ट आपण काहीही केलं तरी बदलू शकत नाही त्याचा अभिमान किंवा गिल्ट बाळगणे हे कमी बुद्धीचे, मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे.

८. आरक्षण इत्यादि योजना या सरकारी पातळीवर - सामाजिक न्याय या संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार केल्या जातात. त्याबद्दल मतांतरे असू शकतात. पण त्याचा वैयक्तिक पातळीवर जातीचा गिल्ट मानण्याशी काडीचा संबंध नाही.

९. तुम्ही काळे जन्मलात आणि तुम्हाला कोणी काळा म्हणाला याची तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही स्वतःच रेसिस्ट असता. तुम्ही अमुक जातीत जन्मलात आणि कोणी तुम्हाला त्या जातीचा म्हणाला त्याचा तुम्हाला राग/लाज/गैरसोय वाटत असेल तर तुम्ही स्वतःच जातीवरून माणसाची लायकी जोखत असता.

१०. तात्पर्य: जात आपल्याला बदलता येत नाही, त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्न उरत नाही आणि त्यासाठी गिल्ट बाळगण्याचीही गरज नाही.

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

नास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता

('आजचा सुधारक'च्या ऑक्टोबर २०२०च्या 'नास्तिक्य'विशेष अंकासाठी लिहिलेला लेख)

नास्तिक्य हा काही या लेखाच्या वाचक मंडळीस नवा विषय नसेल याची खात्री आहे. बुद्धिप्रामाण्यवादाच्या निरंतर प्रवासात सापडणारा एक टप्पा म्हणून आपल्याला नास्तिक्य ओळखीचे आहे. माणूस जन्मल्यापासून ते तो स्वतंत्र विचार करू लागेपर्यंत त्याच्यावर जे संस्कार होतात ते बरेचदा तर्कशुद्ध विचारांच्या प्रवाहाने नंतरच्या आयुष्यात धुतले न गेल्याने आपल्याला धार्मिकांची संख्या लक्षणीय दिसत असते. जसजसे तर्कशुद्ध विचारप्रवाह माणसाच्या मनातील कोपऱ्यांना स्पर्श करू लागतात तसतशी ही जळमटे दूर होतात आणि माणूस अधार्मिक, अश्रद्ध आणि मग नास्तिक असा प्रवास करतो. हे घडत असताना सदर बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला दैनंदिन वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मात्र नास्तिक नसलेल्या, बुद्धिप्रामाण्यवादी नसलेल्या धर्माचे संमिश्र असलेल्या सांस्कृतिक प्रभावाला आणि काही नैतिक कोड्यांना सामोरे जावे लागते. या लेखाचा उद्देश हा नास्तिक्याच्या, बुद्धिप्रामाण्यवादी जीवनाच्या अशा सांस्कृतिक आणि नैतिक बाजूबद्दल ऊहापोह करणे हा आहे. 

बरेचदा ‘संस्कृती’ या नावाखाली धर्म थोपवणे हा उपद्व्याप नास्तिकांना सहन करावा लागतो. आपल्याकडे असे प्रयत्न पार सर्वोच्च न्यायिक यंत्रणा, सरकारी पदांवरील व्यक्ती आणि अन्य सामाजिक आयुष्यातील माननीय व्यक्तींकडून केले गेले आहेत. हिंदू हा कसा धर्मच नाही, आम्ही तर महान संस्कृती आहोत अशा थाटात केली जाणारी विधाने ही वस्तुतः ज्याप्रमाणे कडू औषधास साखरेचे आवरण घातले जाते त्यातला प्रकार असतो! यातून धार्मिक नसलेल्यांना संस्कृती म्हणून किंवा जीवनपद्धती म्हणून का होईना धर्माची गोळी गिळायला भाग पाडणे हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न होत असतो. अर्थात हे काही हिंदूंपुरते मर्यादित आहे किंवा हिंदूंचे असे वैशिष्ट्य आहे असे मुळीच नव्हे. पश्चिमेतही जे धार्मिक नाहीत अशांना धर्माची शिकवण पाजता यावी यासाठी जुडियो-ख्रिश्चन सांस्कृतिक परंपरा, जीवनपद्धती यांचा तिथल्या परंपरावाद्यांकडून वारंवार प्रचार केला जातो. 

आता अमुक एक गोष्ट जीवनपद्धती, संस्कृती आहे असं म्हणणं यात बरीच तार्किक करामत दडलेली असते. कारण जीवनपद्धती आणि संस्कृती या सतत समावर्ती आणि प्रचंड वैविध्यपूर्ण अशा न-नैतिक संकल्पना असतात. त्या व्यक्तिपरत्वे, प्रदेशपरत्वे आणि कालपरत्वे बदलत असतात. त्यामुळे आमच्या सव्वाशे करोड लोकांची किंवा त्यांच्या पूर्वजांची एकच एक अशी काही निश्चित संस्कृती किंवा जीवनपद्धती होती हे तथ्य म्हणजे तर्कावर न टिकणारे विधान आहे. दुसरी बाजू संस्कृती आणि जीवनपद्धती यांच्या न-नैतिक असण्याची. न-नैतिक म्हणजे नैतिकतेशी देणं-घेणं नसलेले या अर्थी! अमुक एखादी गोष्ट हा संस्कृतीचा हिस्सा आहे म्हणून ती वंदनीय होत नाही. अमुक एखादी गोष्ट माझ्या जीवनपद्धतीचा भाग आहे असे म्हणून ती गोष्ट चांगलीच आहे हे ठरत नाही. 

याच कारणाने हिंदू ही एक संस्कृती आहे या कारणाखाली हिंदू धर्माला चिकित्सेच्या, धर्मनिरपेक्षतेच्या मर्यादेच्या नजरेतून सूट देण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येक धर्म हा निश्चितपणे त्या धार्मिक प्रक्रियेच्या भोवतालच्या संस्कृती (Culture) आणि सभ्यता (Civilization) यांच्यावर आपली छाप सोडतच असतो. ही छाप इस्लाम ‘जकात’सारख्या कररचनेद्वारे, व्याज घेणे पाप समजण्याच्या रुढीतून सोडत असेल, ख्रिश्चन धर्म त्यांच्या रविवारी सुट्टी घेण्यातून सोडत असेल तर हिंदू धर्म कशालाही पाय लागल्यावर पटकन नमस्कार करणे, दिसेल त्या देवाला हात जोडणे या सहजभाव बनलेल्या गोष्टींतून सोडत असतो. ती छाप ही त्या धार्मिक प्रक्रियेची ऐतिहासिक बाह्यता (Externality) असते. ती काहीवेळा सोयीची असते, काहीवेळा उपद्रवी असते तर काहीवेळा नुसतीच निरर्थक निरुपद्रवी असते. अशा धार्मिक इतिहासाच्या सांस्कृतिक प्रभावामुळे वर्तमानातील व्यक्तीच्या बुद्धिप्रामाण्यवादी वाटचालीस बाधा येण्याचे कोणतेही ठोस असे कारण दिसत नाही. 

त्यामुळे आपला आहार, आपला पोशाख, आपली भाषा, आपले आविर्भाव आणि आपले सामाजिक संकेत यांच्यावर असलेला धर्माचा प्रभाव हा संस्कृतीच्या मार्गाने आपल्यालाही स्पर्श करतो म्हणून आपण काही लगेच त्या धार्मिकांचे सांस्कृतिक दास झालो असा अर्थ काढायची कोणाही नास्तिकाला, अश्रद्धाला, अधार्मिकाला गरज नाही. किंबहुना असे मानसिक सोवळे पाळणे हे खचितच बुद्धिप्रामाण्यवादी लक्षण नव्हे! त्यामुळे “तुम्ही नास्तिक आहात ना, मग उकडीचे मोदक का खाता?” यासारख्या विचित्र जाब विचारणाऱ्या प्रवृत्तींना बुद्धिप्रामाण्यवादी मंडळींनी भीक नं घालणेच श्रेयस्कर! असे मोदक, केक किंवा शीरखुरमा खाऊन बाटायला आपण काही धार्मिक नव्हे!!

आता ह्या लेखाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे नास्तिक्याच्या नैतिक मूल्यांवरील परिणामांकडे वळू. नैतिकता ही काही नुसती मूठभर तत्त्ववेत्त्या मंडळींच्या गप्पांची गोष्ट नाही हे याठिकाणी सुरुवातीलाच समजून घेतले पाहिजे. नैतिक मूल्यव्यवस्था (Value Structure) हा सामाजिक आणि व्यक्तीच्या पातळीवरील दैनंदिन वर्तणुकीचा एक महत्त्वाचा भाग असतो. आपण चोरी का करू नये, दुसऱ्यांना इजा का करू नये, एखाद्याला मदत का करावी या रोज पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, ही माणसाची मूल्यव्यवस्था पुरवत असते.

सध्या ही मूल्यव्यवस्था मोठ्या प्रमाणात धार्मिक श्रद्धांच्या पायांवर उभी आहे. म्हणजे अगदी लहान मुलालादेखील संस्कार म्हणून काही गोष्टी शिकवताना “हे बघ, चोरी करायची नाही, नाहीतर पाप लागते आणि देव शिक्षा करतो” असं म्हटलं जातं. धर्म हा गेली काही शतके सामाजिक मूल्यव्यवस्थेला आधारभूत ठरला आहे हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही. आपण देव मानायचं बंद केलं, धर्म सोडला, दृश्य श्रद्धा आणि सोपस्कार यांचा त्याग केला तरी त्यामुळे आपण जगत असलेल्या मूल्यव्यवस्थेवरील धर्माचा प्रभाव काही लगेच कमी होत नाही. तसे व्हायला बराच नैतिक विचारकलह माणसाला भोगावा लागतो. मूल्यांना नवे आधार शोधावे लागतात. तत्त्वज्ञानाची बाराखडी गिरवावी लागते. आपल्या अधार्मिक, अश्रद्ध जीवनाला लागणारी नवी नैतिक चौकट ही नास्तिकाला स्वतःच बनवावी लागते.

याठिकाणी नित्शेच्या ‘द गे सायन्स’ मधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असे विधान उद्धृत करणे प्रस्तुत ठरेल.

  • ‘God is dead; but given the way of men, there may still be caves for thousands of years in which his shadow will be shown. — And we — we still have to vanquish his shadow, too. ’ (Sec. 108) 
  • God is dead! God remains dead! And we have killed him. How shall we comfort ourselves, the murderers of all murderers? What was holiest and mightiest of all that the world has yet owned has bled to death under our knives: who will wipe this blood off us? What water is there for us to clean ourselves? What festivals of atonement, what sacred games shall we have to invent? Is not the greatness of this deed too great for us? Must we ourselves not become gods simply to appear worthy of it? (Sec. 125) 

(with courtesy to the original artist)
बऱ्याचदा नित्शेचे हे प्रसिद्ध विधान – ‘God is dead’ हे एखाद्या विजयगर्जनेच्या सुरात वाचले जाते. नित्शेला जणू काही देवाच्या मृत्यूचा आनंद झाला आणि त्याने ही अशी आरोळी ठोकली अशा थाटात त्याचे हे विधान सामायिक झालेले मी बऱ्याच बुद्धिवादी चर्चा-वर्तुळांत पाहिले आहे. इथे एक महत्त्वाची बाब अशी की नित्शेचं ‘God is dead’ हे विधान, हा त्याचा उत्स्फूर्त आनंद किंवा त्याने सांगितलेली विजयाची वार्ता नसून त्याने व्यक्त केलेली चिंता आहे, काळजी आहे! नित्शेचं म्हणणं हे ‘द गे सायन्स’ मधील वर उद्धृत केलेली विधाने लक्षपूर्वक वाचल्यास जास्त साकल्याने समजून घेता येईल. देव जरी संपला असला म्हणजे श्रद्धेला बुद्धिवादाने हद्दपार केले असले, तरी त्याची सावली ही माणसाला अजून बराच काळ छळणार आहे! ही सावली म्हणजे देव/धर्म यांची आपल्या मूल्यव्यवस्थेवरील पकड होय.

भारतातल्या बुद्धिवादी चळवळीने आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरुवात करत त्यानंतर ठाम नास्तिक्याकडे जो आश्वासक प्रवास केला आहे त्याची पुढची दिशा ही भारतीय माणसाच्या मूल्यव्यवस्थेवरील धर्माची सावली संपवण्याकडे वळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. धर्मविरहित, देवाचा आधार नसलेली एक बुद्धिप्रामाण्यवादी नैतिक चौकट उभी करणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. याचे प्रयत्न खुद्द नित्शेने आपल्या तात्त्विक साहित्यातून केले आहेत. त्याचबरोबर पश्चिमेत घडलेले अन्य नास्तिक विचारवंत, बुद्धिवादी लेखक यांनीही या प्रकारची मांडणी केली आहे. भारतामध्ये मात्र अजून आपल्याकडच्या बुद्धिवादी प्रवाहाचा परीसस्पर्श मूल्यव्यवस्थेला घडणे बऱ्याच प्रमाणात शिल्लक राहिले आहे. या लेखाचा एक प्रमुख उद्देश हा बुद्धिवादी मूल्यव्यवस्थेच्या मांडणीकडे नास्तिकांचे, अश्रद्ध मंडळीचे आणि अधार्मिक गटांचे लक्ष वेधावे हा आहे!

येणारी पिढी ही धर्माच्या जोखडातून मागच्या पिढ्यांपेक्षा नक्कीच जास्त मोकळी असणार आहे. देव नाकारणे, अश्रद्ध राहणे, धार्मिक संस्कार झुगारणे हे आता आपल्याकडे काही टॅबू राहिलेला नाही. मात्र देव-धर्म नाकारणारी पिढी तयार होत असताना तिची मूल्ये, तिची नैतिक चौकट ही त्याच देव-धर्माने घातलेल्या आणि आता गंजून गेलेल्या पायावर उभी असणे खचितच निरोगी समाजाचे लक्षण नाही! यासाठी जास्तीतजास्त नास्तिकांनी आणि बुद्धिवादी चळवळींनी या विषयावर चिंतन, लेखन आणि संवाद घडवावे ही येणाऱ्या काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढ्यांवर ‘देव शिक्षा करेल’ या आधारावर टिकलेली सडकी, प्रतिगामी, अवैज्ञानिक मूल्ये लादण्याऐवजी बुद्धिवादी प्रवाहाने एक बुद्धिनिष्ठ, तर्कशुद्ध अशा मूल्यव्यवस्थेची मांडणी उभी करावी हे त्या प्रवाहाला आव्हान देणारे एक नवे आव्हानात्मक क्षितिज आहे. अशा नव्या दमाच्या मूल्यव्यवस्थेवर आधारित समाज निर्माण होणे हे भारताच्या आणि एकंदरच मानवजातीच्या हिताचे आहे. तूर्तास तो ‘सोन्याचा दिन’ येवो अशी आशा व्यक्त करत या लेखाला पूर्णविराम देत आहे! 


https://www.sudharak.in/2020/10/3840/

रविवार, ८ जानेवारी, २०१७

संविधान : गल्लत आणि गफलत

काल टीव्ही बघत होतो ! त्यात मुस्लीम मोर्चाची बातमी बातमी चालली होती. त्यात एक 'युवा आंदोलक खातून' म्हणाली की 'शरीया हमारा संवैधानिक अधिकार है !"... बरेच दिवसांपासून संविधान म्हणजेच आपल्या राज्यघटनेबद्दल अनेक गोंधळ ऐकत आलो आहे, वाचत आलो आहे. संविधानातील तरतुदींचे बरेच विपर्यास, अनेक मतलबी अर्थ लावण्यापासून, ते संविधान हा कॉपीचा प्रकार असून देशविघातक आहे इथपर्यंत विविध गल्लत-गफलत आपल्या देशात चालते ! यामध्ये बऱ्याचदा अज्ञानापोटी किंवा त्याहून जास्तवेळा ढोंगीपणाचा हात असतो. या सगळ्याचा परिपाक म्हणून संविधानाच्या तरतुदींबद्दल, त्याच्या रचनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींबद्दल, आणि एकूणच संविधानासंदर्भात अनेक गैरसमजुती, खोटे अभिनिवेश पसरले आहेत. संविधानाबद्दलच्या अशाच विचित्र गैरसमजांचे एक एक करून खंडन करण्याचा आणि संविधानाबद्दलच्या मुलभूत 'कन्सेप्ट क्लीअर' करण्याचा हा एक प्रयत्न...

Image Credits - Wikipedia

या लेखात संविधानाबद्दलचे गैरसमज किंवा दिशाभूल करणारा मुद्दा/आक्षेप आधी मांडून मग त्याचे थोडक्यात खंडन आपण बघणार आहोत. अशा एकूण मुद्द्यांपैकी पैकी लोकप्रिय आणि अगदीच मुलभूत स्वरूपाच्या जास्तीत जास्त मुद्द्यांविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न राहील. आता एक एक करून मुद्दे आणि खंडन करण्याकडे वळू -


  1. "संविधान बदलण्याचे षड्यंत्र चाललेले आहे !" - ज्याला संविधान या संकल्पनेविषयी मुलभूत माहिती आहे, त्याला हा आक्षेप/ही Conspiracy Theory हास्यास्पद वाटल्याशिवाय राहणार नाही. संविधान म्हणजे कुराण नव्हे, जे बदलणे म्हणजे पाप होईल ! संविधान काही पवित्र गाय नव्हे, ते एक बदलाचे हत्यार आहे. हे घटनाकारांनाही अभिप्रेत होतेच. त्यामुळे बदल चांगला की वाईट यावर चर्चा होऊ शकते, किंबहुना व्हावीच; परंतु संविधानात सुधारणा करणे म्हणजे षड्यंत्र असा समाज साफ चुकीचा आहे.
  2. "संविधान आमच्या जातीचे आहे, त्याला हात लावाल तर खबरदार !" - हे खरंच गंभीर प्रकरण आहे. डॉ आंबेडकर हे संविधान सभेच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते. ते दलितांचे नेतेही होतेच. पण यावरून संविधान हे दलितांचे आहे, त्याला हात लावाल तर खबरदार वगैरे भूमिका घेणे विचित्र आहे ! (म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्रावर खड्डे आहेत. म्हणून पृथ्वी खड्डयाभोवती फिरते अशातला प्रकार झाला हा !!)  संविधान हे देशाचे आहे. त्याला हात लावणे म्हणजे त्याच्या मूलभूत तत्त्वांनाच कोणी हानी पोचवत असेल तर विरोधच असावा. पण संविधानात सुधारणा/घटनादुरुस्ती करणे म्हणजे 'आमच्या' अस्मितेला धक्का हे समीकरण अजब आहे.
  3. "संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले/रचले." - असा समाज असणारे अनेक सुशिक्षित मी बघितले आहेत ! संविधान म्हणजे काही कादंबरी नाही जी एक माणूस बसून लिहून टाकेल !! डॉ. आंबेडकर यांचे कार्य, संविधान सभेतील योगदान मोलाचेच आहे. पण म्हणून 'एकट्या आंबेडकरांनी संविधान लिहिले/रचले' असा समाज बाळगून बसणे म्हणजे शेखचिल्लीचा वारसा चालवण्याचा प्रकार आहे.  असा समाज हा नेहमीच गैरसमज असतो असे नाही. बऱ्याचदा तो अभिनिवेश किंवा अपराधगंड असू शकतो. म्हणजे आक्रस्ताळे दलित नेते तो अभिनिवेश म्हणून वापरतात. तर हल्लीचे काही हिंदुत्ववादी आंबेडकरांच्याबद्दल  अकारण अपराधगंड बाळगून असल्यामुळे, त्यांची स्तुती करताना वास्तवाचे भान ठेवत नाहीत ! मुळात संविधान सभेमध्ये अनेक कमिटी होत्या, त्यापैकी Drafting Committee चे डॉ. आंबेडकर अध्यक्ष होते. हे स्थान महत्त्वाचे नक्कीच आहे. पण म्हणून उरलेल्या कमिटी या कमी महत्त्वाच्या उरत नाहीत ! उदाहरणार्थ - Union Powers Committee, State Committee आणि Union Constitution Committee चे अध्यक्ष पंडित नेहरू होते. तर मुलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक विषयांच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते. सदर कमिटीच्या दोन सब-कमिटी होत्या. त्यातील Fundamental Rights Committee चे अध्यक्ष आचार्य कृपलानी तर, Minorities Sub-Committee चे अध्यक्ष एच.सी.मुखर्जी हे होते. अशाप्रकारे संविधानाची रचना हे एक टीम-वर्क होते, एकट्याने केलेले कादंबरीलेखन नाही !! खुद्द आंबेडकरांना Drafting Committee चे अध्यक्ष बनवण्यात  कॉंग्रेसचा म्हणजे गांधी-नेहरू-पटेल यांच्या राजकीय समजूतदारपणा आणि गुणग्राहकतेचा वाटा होता हे संविधान सभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेतल्यास सहज समजेल. त्यामुळे आंबेडकरांचे कार्य मोलाचेच आहे, पण आंबेडकरांनी घटना रचली हा दावा तर खुद्द आंबेडकरांनीही धुडकावला असता !!
  4. "संविधान म्हणजे फक्त कॉपी आहे !" - संविधान सभेसाठी निवडणुका झाल्या, जवळपास ११ अधिवेशने झाली, १०-१२ महत्त्वाच्या कमिटी होत्या... इतकं सगळं फक्त कॉपी करण्यासाठी कोण का करेल !!! हा आरोप राजीव दीक्षित आणि कंपनी किंवा तत्सम Conspiracy Theories च्या चाहत्यांचा आवडता आणि नेहमीचा हुकुमाचा एक्का आहे ! (आता तो जोकरपेक्षा हास्यास्पद आहे हा भाग निराळा !!)  १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायद्याची कॉपी म्हणजे घटना असा या बाजूचा ग्रह(किंवा आग्रह !) आहे. हा प्रकार अजून विचित्र आहे ! १९३५चा कायदा हा ब्रिटीश संसदेने केलेला, भारताच्या प्रशासनिक सोयीचा एक कायदेशीर भाग होता ! (त्यात खरी प्रांतिक स्वायत्तता वगैरे अंतर्भूत होती की नव्हती तो भाग अजून वेगळा) भारताची राज्यघटना हा एका स्वतंत्र मानवसमुहाने स्वीकारलेला ठराव होता ! राज्यघटनेनंतर भारत हे स्वतंत्र राष्ट्र, सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून अस्तित्त्वात आले. १९३५ चा कायदा झाल्यानंतर असं काहीच झालं नाही ! हे खरं आहे की १९३५ च्या कायद्याचा वापर घटनेचा स्त्रोत-संदर्भ म्हणून केला गेला आहे. त्याचं कारण भारतासारख्या खंडप्राय देशाची असलेली शासनव्यवस्थाच स्वतंत्र भारताला अंगीकारून आवश्यक तिथे बदलायची होती. याच कारणासाठी Transfer of Power नांवाचा करार करण्यात आला होता. अन्यथा, ब्रिटीश सत्ता निघून गेल्यानंतर System Vacuum म्हणजे व्यवस्था-पोकळी निर्माण होऊन, आधीच फाळणीने संकटात असलेली अखंडता अजून धोक्यात आली असती. मात्र राजीव दीक्षित आणि कंपनी तसेच अन्य जहाल राष्ट्रवादी म्हणवणारे हे समजून घेत नाहीत. त्यांच्या मते सर्व ब्रिटीश व्यवस्था उचलून फेकून द्यायला हवी होती ! पण जर असं झालं असतं तर आज या लोकांना भजायला, पुजायला 'भारत' उरलाच नसता !! एखादा मानवसमूह जेव्हा राष्ट्र म्हणून स्वतंत्र होत असतो तेव्हा असा आक्रस्ताळेपणा करून चालत नाही. असलेला ढाचा स्वीकारून, सत्ता स्थिर करून आपली स्वतंत्र धोरणे आखावी लागतात. अन्यथा सगळ्याचाच विनाश होऊन, अराजक नांवाची चेटकीण त्या नवजात स्वातंत्र्याला गिळून टाकायला जिभल्या चाटत बसलेलीच असते ! भारताचे तसे हाल झाले नाहीत, यामागे नेहरू-पटेल आणि तत्कालीन नेतृत्वाची दूरदृष्टी आणि विवेकबुद्धी आहे. त्यांचे ऋणी असायचे सोडून, उलट त्यांनाच शिव्या देण्याची राजीव दीक्षित छाप राष्ट्रवादीगिरी (!) हे मूर्खांचे चाळे आहेत. भारताची राज्यघटनासुद्धा याच कारणामुळे आधीच्या प्रशासनिक कायद्यांचा आधार घेऊनच बनवली गेली आहे. पण फक्त १९३५ च्या कायद्याची कॉपी म्हणजे राज्यघटना असे मुळीच नाही. विविध देशांच्या राज्यघटनांमधून, भारतीय संविधानात आवश्यक ती मुल्ये, व्यवस्था, संकल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत. अशी गुणग्राहकता हा सद्गुण आहे ! त्यामुळे हा 'कॉपी'वाला आरोप मूर्खपणा आणि द्वेषबुद्धीचे मिश्रण घेऊन जन्मलेला आहे असे दिसते...
  5. "स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आंबेडकरांनी दिली !!" - हा अजून एक स्तुतीदोष आहे ! ज्यात पुन्हा पूर्वी उल्लेखलेल्या दोन बाजू म्हणजे - आक्रस्ताळा दलित अभिनिवेश आणि अपराधगंडपिडीत हिंदुत्व -समाविष्ट आहेत ! वस्तुतः ही तिन्ही मुल्ये फ्रेंच राज्यक्रांतीची जगाला देण आहेत. (आता समतेला मूल्य म्हणावे का, त्याचा अर्थ काय हा गहन वाद आहे !) आंबेडकरांनीही ही मुल्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या अभ्यासातूनच आत्मसात केली असावीत. आंबेडकर या मूल्यांचे कडवे समर्थक होते यात शंकाच नाही. पण स्तुती करताना उगाच बांध फोडून, ती मूल्येच आंबेडकरांनी दिली असे म्हणणे चुकीचेच ठरते.
  6. "संविधानाने आरक्षण आणले, संविधान हा सवर्णांवर अन्याय आहे" - बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करणारी एक सवर्ण मानसिकता अस्तित्त्वात आहे. सोशल मिडियावरही अत्यंत असभ्य भाषेत व्यक्त होणारी ही मानसिकता, सध्याच्या सवर्ण-आंदोलनांच्या काळात, बळावलेली दिसते. एकीकडे घटनेच्या चौकटीत असल्याचा दावा आरक्षण मागायचं, आणि नाही मिळालं तर मग घटनाच नको आम्हाला, असा झुंडवादी पवित्र घ्यायचा हे या मानसिकतेचे लक्षण आहे. इथे बराच घोळ आणि खोटेपणा आहे. सध्याचे दिसणारे आरक्षणाचे स्वरूप हे जास्त करून नव्वदच्या दशकातील मंडल आयोगाचे फलित आहे. संविधान निर्माण झाले त्या काळात आरक्षण ही खरंच गरज होती. त्याविना सामाजिक अस्पृश्यांना  एक प्रकारे पारतंत्र्यातच राहावे लागले असते. त्यानंतरच्या काळात, राजकीय फायद्यासाठी आरक्षणाचा 'लॉलीपॉप' म्हणून वापर झाला, यात आंबेडकरांचा काय दोष ? हा म्हणजे एखादा रुग्ण मात्रेच्या एका चमच्याऐवजी द्राक्षासवाची अख्खी बाटली प्याला, त्यामुळे झिंगला आणि दोष मात्र औषध देणाऱ्या वैद्याला; अशातला प्रकार झाला !!! आरक्षण हा सूड नव्हे, तो एक उपाय आहे. किंबहुना 'होता' ! याची सविस्तर आणि सखोल चर्चा या ब्लॉगवरील आरक्षणासंबंधित लेखमालेत केली आहे. त्यामुळे संविधान हे सवर्णांच्या विरोधातील षड्यंत्र मुळीच नाही. उलटपक्षी भारताला यादवीपासून वाचवण्यात संविधानाचा (आणि आंबेडकरांचाही) मोठा वाटा मात्र नक्की आहे !
  7. "शरिया हा आमचा संवैधानिक अधिकार आहे !" - मुळात हे ज्या मोर्च्याच्या 'युवा' नेत्यांचे म्हणणे आहे, तो मोर्चाच असंवैधानिक कारणांसाठी काढला गेलेला आहे ! धर्मावर आधारित आरक्षण हा संविधानाचा सर्वात मोठा अपमान ठरेल. घटनेच्या Secularism या मुलभूत गाभा-तत्त्वाचा (Core Principle) तो खून ठरेल यात शंका नाही, मग शरिया तर दूरचाच विषय ! खरंतर इस्लामिस्ट लोकांकडून घटनेची ढाल पुढे केली जाने, हा प्रकारच विचित्र आहे !! कारण धर्मपिसाट इस्लामिस्ट लोकांसाठी घटना नाहीच आहे. त्यांच्यासाठी अख्खा पाकिस्तान कापून दिला आहे. घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात 'समान नागरी कायद्या'चा स्पष्ट उल्लेख आहे. दुर्दैवाने घटना तयार होत असताना, नुकतीच देशाने फाळणी बघितली असताना, असा कायदा किंवा तशी तरतूद करणे घटनाकार मंडळींना धोकादायक तर (राजकीय नेतृत्वाला गैरसोयीचे) वाटले असावे !! परंतु मार्गदर्शक तत्त्वे, तसेच संविधानाचा गाभा असणारे Secularism चे मूल्य 'शरिया' नांवाच्या रानटी, पिसाट गोष्टीला कदापि थारा देणार नाही. इतकेच काय, तर मुस्लीम पर्सनल लॉं बोर्ड नांवाच्या समांतर व्यवस्थेला लवकरात लवकर बरखास्त करणे हेच संविधानाच्या गाभ्याच्या रक्षणासाठी आवश्यक बनले आहे !!

संविधानाबद्दलचे भ्रम, गैरसमज, बुद्धिभेद दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखातून केला आहे. गल्लत, गफलतीचे लोकप्रिय मुद्दे एक एक करून खोडून काढले आहेत. अनेक राजकीय-सामाजिक विषयांच्या चर्चा आणि विवादामध्ये संविधानाचे संदर्भ येत असतात. तेव्हा संविधानाबद्दलच मुलभूत गैरसमज असणे एकंदरच लोकशाही आणि विधायक चर्चेच्या हिताचे नाही. त्यामुळे संविधानाबद्दलचे वरील मुद्दे आणि स्पष्टीकरणे ध्यानात ठेवून, आपण नागरिक म्हणून अधिक सुजाण बनू, हीच अपेक्षा...

- संदर्भ लिंक्स -