गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग ८

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या आठव्या भागात आपण भारतातील सध्या ऐरणीवर असलेला डीलिमिटेशनचा प्रश्न, भारतीय संघराज्य प्रणाली आणि त्यासंबंधित लोकशाही व्यवस्थेचे काही मूलभूत प्रश्न चर्चेसाठी घेणार आहोत...

भाग ८ : डीलिमिटेशनची बेरीज-वजाबाकी!

भारतीय संसदेचा विस्तार, महिला आरक्षण आणि डीलिमिटेशन याप्रकरणी मोदी सरकारने नुकतेच संसदेत विधेयक आणून त्याद्वारे घटनादुरुस्तीचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलावले गेले असून संसदेत या विधेयकासंबंधीचे कामकाज सुरू झाले आहे. अपेक्षेप्रमाणेच संबंधित घटनादुरुस्तीबाबत सध्या देशभरात मोठा वादंग माजलेला आहे! दक्षिणेतील राज्ये किंवा एकंदरच ज्यांचा जन्मदर कमी आहे अशी प्रगत राज्ये हे प्रस्तावित डीलिमिटेशन झाल्यावर आपले राजकीय वजन गमावून बसतील अशी भीती विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे...

https://prsindia.org/billtrack/prs-products/prs-bill-summary-1776322465

आता या लेखमालेचा मुख्य विषय असलेला जन्मदर हाच या डीलिमिटेशन वादाच्या केंद्रस्थानी असल्याने याआधीच्या भागात आपण भारतीय जन्मदर आणि त्यातील राज्यनिहाय फरक याबाबत जी आकडेवारी बघितली होती त्याची थोडक्यात उजळणी इथे केली पाहिजे. या लेखमालेच्या सहाव्या भागात म्हणजे “मुंबई लोकलमधील बिहारी गर्दीचे गणित!” या लेखामध्ये आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे या सरकारी उपक्रमाने प्रसिद्ध केलेली सांख्यिकी लक्षात घेतली होती. यामध्ये आपण जे राज्यनिहाय आकडे बघितले होते त्यानुसार भारतातील प्रगत राज्यांचा जन्मदर हा लक्षणीय प्रमाणात घसरला आहे. जर आपण पाचव्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार २०१९-२० दरम्यान नोंदवेलेले आकडे बघितले तर महाराष्ट्र १.७, गुजरात १.९, कर्नाटक १.७, गोवा १.३, बंगाल १.६ असं चित्र बघायला मिळतं. त्यातुलनेत उत्तरेतील तुलनेने कमी प्रगत राज्यांचा विचार केला तर बिहार ३.० वर आहे! उत्तरप्रदेश २.४ च्या घरात तर झारखंडचा आकडा २.३ इतका दिसतो.


NFHS-5: TFR across states

आता आपल्या देशात जी लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, त्यानुसार एक व्यक्ती, एक मत हाच आधार मानला जातो. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८२ नुसार प्रत्येक जनगणना झाल्यावर डीलिमिटेशन होण्याची अपेक्षा केली गेली होती. कलम ८२ मधील याबाबत असलेला मजकूर फार स्पष्ट होता. “Upon the completion of each census, the allocation of seats in the House of the People to the States and the division of each State into territorial constituencies shall be readjusted by such authority and in such manner as Parliament may by law determine..” अशा प्रकारची अपेक्षा संविधान तयार करताना कलम ८२ द्वारे व्यक्त केली गेली होती.

आता ही प्रक्रिया तत्कालीन सत्ताधारी लोकांना राजकीयदृष्ट्या त्रासदायक वाटल्याने त्यांनी यात बरीच टाळाटाळ केली आणि त्यानंतर १९७६ मध्ये सरळ एक घटनादुरुस्ती करून ही प्रक्रिया २५ वर्षे पुढे ढकळून दिली! म्हणजे २००१ पर्यन्त “टेंशन संपलं”!! आता २००१ मध्ये परत हा मुद्दा समोर आला. तेव्हा सत्तेत असलेल्या मंडळीनेही संविधानाच्या अपेक्षित उद्देशाला बाजूला ठेवून आपल्या राजकीय गैरसोयीचा विचार केला आणि हे प्रकरण अजून काही दशकं लांबणीवर टाकून देण्यासाठी घटनेत आवश्यक तो बदल करून टाकला, त्यामुळे २०२६ नंतर जी जनगणना होईल तेव्हा हे डीलिमिटेशन करायचं ही कायदेशीर परिस्थिती तयार होऊन बसली...

आता या दोन घटनादुरुस्ती झाल्यामुळे २०२६ नंतर जी जनगणना व्हायची ती होईपर्यंत १९७१ च्या जनगणनेच्या आधारेच राज्यांचे संसदेतील हिस्से ठरवले गेले. म्हणजे आज आपल्याला जे राज्यनिहाय बलाबल संसदेत दिसत आहे त्याचा आधार तब्बल साडेपाच दशके जुना आहे! कारण त्यानंतर भारतात जी सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतरे झाली त्याचा हिशोब करायची वेळ २०२६ नंतर उजाडणार होती... कलम ८२ मध्ये दुरुस्ती करून त्यात नक्की काय मजकूर घातला गेला ते बघितल्यावर या राजकीय ढकलगाडीचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल! “Provided also that until the relevant figures for the first census taken after the year 2026 have been published, it shall not be necessary to readjust—

(i) the allocation of seats in the House of the People to the States as readjusted on the basis of the 1971 census; and

(ii) the division of each State into territorial constituencies as may be readjusted on the basis of the 2001 census,
under this article.”

COI - Article 82 : Readjustment after each census

आता ही गोष्ट तुम्हाला इथे पहिल्यांदाच वाचायला मिळाली असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका! आपल्याकडे संविधान वाचवायची बोंब ठोकणारे विविध रंगाचे राजकीय गट ही गोष्ट शक्यतो कधी चर्चेला घेतच नाहीत, त्यांना संविधानाच्या प्रत्यक्ष मजकूर आणि उद्देशापेक्षा “संविधान हाच आमचा धर्मग्रंथ!” नांवाची सोयीस्कर श्रद्धा जास्त प्यारी आहे! जसे अनेक कट्टर धर्मवादी सहसा धार्मिक ग्रंथ वाचत नाहीत तसेच हे संविधानावर लटके प्रेम दाखवणारे लबाड लोकही संविधानाचा कलम ८२ सारखा महत्त्वाचा मजकूरही फारसा लक्षात घेत नाहीत, त्यांच्यासाठी संविधान ही पूजण्याची गोष्ट आहे, वाचण्याची नाही!!

यामुळेच इतरत्र उठताबसता संविधानाची चिंता करायचा ठेका घेतल्याचा आव आणणारे काही “पुरोगामी” नेते बिनधास्तपणे आरक्षण वाढवण्यासाठी “जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी हिस्सेदारी” असं म्हणून रान उठवतात! याबाबतीत संविधानकर्त्यांना अपेक्षित असलेली ५०% जातीय आरक्षणाची मर्यादाही त्यांना गौण वाटते. मात्र कलम ८२ मधील संविधानाला अपेक्षित असलेल्या “जितनी आबादी, उतना हक” या राज्यांचा संसदेतील वाटा निश्चित करणाऱ्या तत्त्वाचा मुद्दा आला की हेच नेते “दक्षिणेतील राज्यांना लोकसंख्या नियंत्रण केल्याची शिक्षा देऊ नका!” असं म्हणून डीलिमिटेशन टाळायची मागणी करतात! म्हणजे जातीचे राजकारण करताना यांना संविधानिक मूल्यांचा अव्हेर करूनही बहुसंख्यांकवाद प्यारा असतो, मात्र राज्यांचे संसदेतील वजन ठरवताना मात्र लोकसंख्येचा आधार घेतल्यावर यांच्या पोटात दुखू लागते अशी यांची मजेशीर विचारसरणी आहे..

याच विषयावरील गेल्यावर्षीचं एक ट्विट...

आता यामध्ये पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विकास आणि अर्थव्यवस्थेतील योगदानाचा! दक्षिणेतील डीलिमिटेशनला विरोध करणारे नेते “आम्ही किती टॅक्स देतो बघा..” असं म्हणत आपल्या आर्थिक प्रगतीच्या जोरावर “एक व्यक्ती, एक मत” या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाला बगल देऊ इच्छितात. केरळ किंवा तामिळनाडूमध्ये विकास झाल्यामुळे आता तिथल्या व्यक्तीच्या मताला एखाद्या बिहारी माणसाच्या मतापेक्षा अधिकची किंमत आली आहे असा या भूमिकेमागचा गर्भितार्थ असतो! हीच विचारसरणी सार्वत्रिक वापरायची झाली तर मुकेशभाई अंबानींच्या मताची किंमत एखाद्या सामान्य मजुरापेक्षा जास्त ठरवावी काय? असं झाल्यास ती आपल्या संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही व्यवस्था असेल काय? हे महत्त्वाचे प्रश्न डीलिमिटेशनविरोधक मंडळी सोयीने टाळत आली आहे..

आता इथे या संघराज्य व्यवस्थेसंबंधित प्रश्नाच्या बाबतीत अमेरिकन लोकशाही व्यवस्थेचा संदर्भ घेणे उपयुक्त आहे! आपल्याकडे जो वाद कधीकधी होतो, तो अमेरिकन राजकारणात नेहमी होत असतो. तिथे अमेरिकन कायदेमंडळाचा हिस्सा असलेले वरिष्ठ सभागृह म्हणजे अमेरिकन सिनेट (आपल्याकडील राज्यसभेच्या समकक्ष) हे जेव्हा अमेरिका एक संघराज्य म्हणून अस्तित्वात आली तेव्हापासून राज्यांच्या ठरलेल्या संख्याबळानुसार निवडले जाते! म्हणजे कोणत्या राज्यात किती लोकसंख्या आहे याचा अमेरिकन वरिष्ठ सभागृहाला काही फरक पडत नाही. अमेरिकेत असलेल्या पन्नास राज्यांसाठी प्रत्येकी दोन असे खासदार सिनेटमध्ये निवडले जातात. याचा उगम ज्या करारापासून झाला त्याला “द ग्रेट कॉमप्रमाईज ऑफ १७८७” असं म्हटलं जातं, याबाबतीत विकिपीडयाने केलेले वर्णन पुढीलप्रमाणे आहे:

“The Connecticut Compromise, also known as the Great Compromise of 1787 or Sherman Compromise, was an agreement reached during the Constitutional Convention of 1787 that in part defined the legislative structure and representation each state would have under the United States Constitution. It retained the bicameral legislature as proposed by Roger Sherman, along with proportional representation[a] of the states in the lower house or House of Representatives, and it required the upper house or Senate to be weighted equally among the states; each state would have two members in the Senate.”

Wikipedia - Connecticut Compromise

हा मुद्दा अजून नीट समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण बघू! अमेरिकेतील एक राज्य आहे, व्योमिंग, त्याची लोकसंख्या आहे साधारण ६ लाख... त्याच देशात दुसरं एक राज्य आहे कॅलिफोर्निया, त्याची लोकसंख्या आहे जवळपास ४ कोटी... आता या वर दिलेल्या कराराच्या कृपेने या दोन्ही राज्यांचे सिनेटर प्रत्येकी दोन असेच आहेत! म्हणजेच चार कोटी लोकांचे दोन खासदार, सहा लाखांचेही दोनच खासदार! अमेरिकन सिनेट आपल्याकडील राज्यसभेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे, त्या सभागृहाला असलेलं राजकीय वजन आपल्या राज्यसभेपेक्षा बरंच जास्त आहे. तिथे न्यायमूर्ती नेमणूक असेल किंवा राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवणे असेल किंवा महत्त्वाची विधेयके असतील, या सगळ्या गोष्टी सिनेटमध्ये मंजूर झाल्याशिवाय पुढे लागू होत नाहीत...

आता अमेरिकेत परिस्थिती अशी आहे की कॅलिफोर्नियासारखी प्रगत, जास्त शहरी लोकसंख्या असलेली राज्ये डाव्या आणि लिबरल लोकांचा म्हणून समजल्या जाणाऱ्या डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने झुकलेली दिसतात. तर तुलनेने कमी प्रगत राज्ये, ग्रामीण भाग, शेतीवर अवलंबून असलेली राज्ये ही तुलनेने उजव्या आणि रूढीवादी विचारांच्या रिपब्लिकन पक्षाकडे झुकलेली दिसतात. त्यामुळे अमेरिकेत बहुतांश डावे आणि बरेचसे लिबरल सिनेटची ही व्यवस्था अप्रिय मानतात. सिनेट हे अमेरिकन व्यक्तीऐवजी जमिनीला मताचा अधिकार देतं, त्यामुळे ही लोकशाहीविरोधी व्यवस्था असल्याची टीका या अनुषंगाने होत असते! यामध्ये जेव्हा ही व्यवस्था बनली तेव्हा गोऱ्या लोकांचीच मक्तेदारी असल्याने, आता पुरोगामी राज्यांत संख्येने वाढलेल्या अश्वेतवर्णीय लोकांवर ही व्यवस्था अन्याय करते असा दावा याप्रकरणी होताना आपल्याला बघायला मिळतो...

'The Senate is broken': system empowers white conservatives, threatening US democracy

आता ही अमेरिकन व्यवस्था जाणून घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की भारतीय संविधानकर्त्यांना भारतामध्ये अशी परिस्थिती अजिबात नको होती. कलम ८२ मधील दर जनगणनेनंतर करायचे राज्यनिहाय पुनर्वाटप असो किंवा आपल्या राज्यसभेचा ढाचा असतो, सर्वत्र “एक व्यक्ती एक मत” अशीच व्यवस्था लागू असणे आपल्या संविधानाला अभिप्रेत आहे. अमेरिका हा ज्या स्वरूपात स्पष्टपणे राज्यांचा संघ आहे, तशी कडक संघराज्य व्यवस्था भारतीय संविधानात नाही. उलट आपल्याकडे संघ/केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या नंतर अनेक संस्थाने/राज्ये साम दाम दंड भेद वापरुन नामोहरम करत हा आज आपल्याला दिसणारा एकसंध खंडप्राय देश उभा केला आहे. सरदार पटेलांना याच योगदानासाठी आपल्याकडे विशेष नावाजले जाते!

अशा परिस्थितीत संविधानाला अपेक्षित असलेल्या डीलिमिटेशनला विरोध करणे म्हणजे भारतीय लोकशाही व्यवस्थेचे “एक व्यक्ती, एक मत” हे तत्त्व नाकारण्याचा प्रकार आहे. आपल्याकडे कुठलीही सहकारी संस्था ही एका सभासदाला एका मताचा अधिकार देते, मग तो कितीही श्रीमंत असो किंवा गरीब! याउलट एखादी लिमिटेड कंपनी ही तुमच्या आर्थिक ताकदीवर मताचा अधिकार ठरवते, कारण जॉइंट स्टॉक लिमिटेड बाय शेअर स्वरूपाच्या कंपनीत तुमची जेवढी गुंतवणूक अधिक तेवढी कंपनीच्या सर्वसाधारण सभेत तुमच्या मताची किंमत जास्त असते. जर उद्या एखाद्या सहकारी संस्थेने हा कंपनीचा मार्ग अवलंबला आणि व्यक्तीऐवजी व्यक्तीने गुंतवलेल्या समभागाच्या एकूण रकमेला किंमत देत मताचे अधिकार दिले तर ती सहकारी संस्था उरणार नाही, तिचं सहकार तत्त्वाचा आत्मा त्यातून निघून जाईल! त्याचप्रमाणे भारतीय लोकशाही ही “एक व्यक्ती, एक मत” याच तत्त्वावर आधारलेली आहे, त्या तत्त्वाला न्याय द्यायचा असेल तर घटनेला अपेक्षित होतं त्याप्रमाणे दर जनगणनेनंतर संसदेच्या राज्यनिहाय जागांचं पुनर्वाटप करणे गरजेचं आहे!

अर्थातच सध्या ज्यांनी ही घटनादुरुस्ती आणली आहे त्यांचं हेतू काही असा शुद्ध तात्त्विक वगैरे आहे असं नाही, पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना डीलिमिटेशन ही एक गैरसोय वाटत असे, त्याऐवजी आताच्या सत्ताधारी मंडळीला डीलिमिटेशन ही एक राजकीय सोय वाटत आहे इतकाच फरक आहे! डीलिमिटेशनचे बहुतांश विरोधक नेते हे जातीय बहुसंख्याकवाद बिनदिक्कतपणे जोपासतात मात्र त्यांना धर्म आणि प्रांत याबाबतीत बहुसंख्याकवाद राजकीयदृष्ट्या परवडत नाही, म्हणून त्यांचा डीलिमिटेशनला विरोध आहे. याउलट सध्याची सत्ताधारी मंडळी जात, धर्म आणि प्रांत अशा सर्वच बाबतीत बहुसंख्याकवादी असल्याने त्यांना डीलिमिटेशनची ही २०२६ मध्ये नव्याने आलेली संधी फायदेशीर वाटत आहे...

मात्र हे वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय हेतू काहीही असले तरी भारतीय राज्यघटना नियमित डीलिमिटेशनच्या बाजूने आहे हे स्पष्ट आहे! त्यामुळे ज्यांना “एक व्यक्ती, एक मत” हे तत्त्व मान्य नाही त्या मंडळीचा प्रत्यक्षात भारतीय राज्यघटना आणि तिची पायाभरणी करणाऱ्या या देशाच्या संविधानकर्त्यांनाच विरोध आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. लोकसंख्येच्या आधारे नियमित डीलिमिटेशन/संसदेच्या संख्याबळाचे पुनर्वाटप होणे हेच आपल्या संविधानाची पायभरणी करणाऱ्यांना अपेक्षित होतं हे एक ऐतिहासिक सत्य आहे. आता “आम्हाला अशी लोकशाहीच नको” असं कोणाचं उघड म्हणणं असेल तर प्रश्न वेगळा, पण ज्यांना लोकशाहीच्या “एक व्यक्ती, एक मत” या तत्त्वाची चाड आहे त्यांनी लोकसंख्येच्या आधारे होणाऱ्या नियमित डीलिमिटेशनला विरोध करण्याचे काहीही कारण नाही, कारण जन्मदराने लोकसंख्या आणि लोकसंख्येने लोकशाही प्रभावित होणे हा आपल्या सध्याच्या संविधानिक व्यवस्थेचा एक अपरिहार्य परिणाम आहे! उद्योगपती मुकेशभाई अंबानी यांनाही एक मत आणि त्यांच्या कारखान्यात मजूरी करणाऱ्याला माणसालाही एकच मत हा नियम राज्यांनाही लागू आहे! केरळमधल्या शशी थरूर यांना ते भारी इंग्लिश बोलतात, उच्चशिक्षित आहेत आणि श्रीमंत आहेत म्हणून एखाद्या अशिक्षित, गरीब बिहारी माणसाच्या दुप्पट मताधिकार मिळणार नाही! भारतीय घटना मताधिकार देताना असा भेदभाव करत नाही ही गोष्ट आपण भारताचे नागरिक म्हणून नीट समजून घेतली पाहिजे...

अशाप्रकारे आपण या लेखमालेच्या आजच्या भागात राज्यनिहाय जन्मदरातील फरक, भारतीय संविधानाला अपेक्षित असलेल्याप्रमाणे लोकसंख्येच्या आधारे डीलिमिटेशन, भारतीय आणि अमेरिकन व्यवस्थेतील फरक, या प्रश्नाचे राजकीय कंगोरे आणि त्यानुषंगाने आपल्या लोकशाही व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला आहे. या लेखमालेमध्ये मला जे काही लिहायचं होतं ते अशाप्रकारे आजपर्यंतच्या एकूण आठ भागांमध्ये मिळून बऱ्यापैकी लिहून झालं असल्यामुळे याठिकाणी “लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न” या लेखमालेचा समारोप करत आहेत! ही लेखमाला पहिल्या भागापासून नियमितपणे वाचणाऱ्या आणि आपला प्रतिसाद नोंदवणाऱ्या सर्व वाचकांचे मनापासून आभार मानून याठिकाणी रजा घेतो...

बुधवार, ४ मार्च, २०२६

इराण युद्धाचे अर्थशास्त्र

१. शाहेद ड्रोन हे इराणचे स्वतःचे तंत्रज्ञान आहे. किंमतीने स्वस्त, आकाराने लहान आणि परिणामकारक अशा प्रकारची ही ड्रोन सध्या इराणचे मोठे बलस्थान म्हणून समोर येत आहेत. ही ड्रोन बनवायला इराणला जेवढा खर्च येतो त्याच्या काही पटीने खर्च ती ड्रोन इंटरसेप्ट करायला अरब राष्ट्रांना करावा लागत आहे. म्हणजे सोप्या भाषेत समजा तुम्ही शत्रूवर १०० रुपयांचा बाण फेकत असाल तर शत्रूला तो बाण हवेतच नष्ट करण्यासाठी ५०० रुपये लागत राहिले तर तुम्ही युद्धाचे अर्थकारण तुमच्या बाजूला घेऊन लढत असता!

२. एकंदरच इराणला ड्रोन आणि मिसाईल बनवण्यासाठी येणारा खर्च हा ती यशस्वीरित्या इंटरसेप्ट करण्यासाठी अरब राष्ट्रांना येणाऱ्या खर्चाहून बराच कमी आहे. त्यामुळे अरब राष्ट्रांसमोर किंवा अगदी इस्राईलसमोरसुद्धा दिवसेंदिवस खर्चाचा डोंगर वाढत चालला आहे. याची खात्री करायची असल्यास एकदा अमेरिकन पेट्रियट किंवा THAAD किंवा इस्राईली आयर्न डोम किंवा तत्सम एअर डिफेन्स व्यवस्था बनवायला किती अब्ज डॉलर्स खर्च येतो हे एकदा गुगल करून बघा!

३. यातही अडचण अशी आहे की प्रत्येक एअर डिफेन्स यंत्रणेला एक विशिष्ट सक्सेस रेट असतो. म्हणजे समजा तुमच्यावर १०० मिसाईल आणि ५०० ड्रोन डागली गेली तर तुम्ही कितीही भारीतली भारी इंटरसेप्टर यंत्रणा विकत घेऊन बसला असला तरी त्यातली १० मिसाईल आणि ५० ड्रोन टार्गेटवर लागूच शकतात! यालाच ९०% सक्सेस रेट म्हणता येईल...

४. एक ड्रोन बनवायला काही हजार डॉलर्स खर्च येतो. तो ड्रोन टार्गेटवर लागला तर एखादा तेल प्रकल्प, तेलाचा डेपो किंवा तत्सम अब्जावधी डॉलर्स किंमतीच्या टार्गेटला आग लागू शकते. इराणची जास्त दर्जेदार मिसाईल ड्रोनपेक्षा बरीच महाग असली (म्हणजे काही लाख डॉलर्स) तरी त्यांनी अमेरिकेच्या अब्जावधी डॉलर्स किंमतीच्या रडारची बरबादी केलेली दिसत आहे.

५. अरब राष्ट्रे स्वतः फार कमी प्रमाणात शस्त्रे बनवतात. इस्राईललाही अमेरिकाच मोठ्या प्रमाणात इंटरसेप्टर यंत्रणा पुरवत असते. आता जगभरातील अमेरिकन तळांनाही अशाच यंत्रणा स्वतःच रक्षण करण्यासाठी लागतात. अमेरिका कितीही अजस्त्र असली तरी तिच्या काही जादूची छडी नाही. इराणविरुद्ध खर्च होणारे प्रत्येक इंटरसेप्टर मिसाईल हे त्यांना पुन्हा बनवावे लागणार आहे. ही अत्यंत किचकट तांत्रिक उत्पादने असल्यामुळे ती बनवायला वर्ष दोन वर्ष लागतात. त्यात करून चीनने नेमका याचवेळी रेअर अर्थ मटेरियल आणि तत्सम इनपुटचा पुरवठा बंद केला तर ही स्थिती अजून भीषण होऊ शकते!

६. यामुळे सध्या अमेरिकन इंटरसेप्टर मिसाईलचा साठा मोठ्या प्रमाणात घटत चालला आहे. एकाचवेळी इस्राईल, अरब राष्ट्रे आणि आपले डझनभर सैनिकी तळ त्यांना वाचवावे लागत असल्याने अमेरिकन लष्कराची ओढाताण होत आहे. यामुळेच दक्षिण कोरिया वगैरे भागात ठेवलेले इंटरसेप्टर मध्यपूर्वेत घेऊन यायचा विचार केला जात आहे. इराण युद्ध जितकं जास्त दिवस चालेल तितकी ही लॉजिस्टिक्सची परिस्थिती अमेरिकेसाठी बिकट होत जाणार आहे.

७. इराणने आतापर्यंत अवघ्या काहीच दिवसांत अमेरिका आणि अरब राष्ट्रांचे काही अब्ज डॉलर्सचे नुकसान केलेले आहे. सौदी, यूएई, बहारीनसारखी अरब राष्ट्रे तेल, पर्यटन आणि विमानतळ यांच्यासाठी नावाजली जातात. इराणने या तिन्ही उद्योगांवर हल्ला केल्यामुळे त्यांना दर दिवसाला प्रचंड आर्थिक फटका बसत आहे.

८. हे युद्ध सुरू राहिल्यास स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत असलेल्या इराणकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ अरब राष्ट्रे पिण्याच्या पाण्यासाठी निक्षारीकरण प्रकल्पांवर अवलंबून आहेत. कारण अरब राष्ट्रांत गंगायमुनेसारख्या मोठ्या नद्या किंवा लेक मिशिगनसारखे तलाव फारसे उपलब्ध नाहीत, त्यांना मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी शुद्ध करून प्यावे लागते! इराणने ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला अशा पाणी प्रकल्पांवर किंवा वीज पुरवठा व्यवस्थेवर केंद्रित केल्यास अरब राष्ट्रांसमोर भीषण परिस्थिती उद्भवू शकते.

Peter is worried!

९. हॉर्मुझची सामुद्रधुनी सध्या इराणने नुसतीच रोखून धरली आहे. तिथे सागरी सुरुंग किंवा तत्सम जहाजघातक यंत्रणा लागू इराणला शक्य आहे. इराणने तुमचे जहाज बुडवायचा धोका समजा १०% जरी असला तरी त्यामुळे विमा कंपन्या जहाजांना विमा द्यायला घाबरतात. जहाज मालक त्यामुळे आपली जहाजे धोक्यात घालत नाहीत. त्यामुळे अरब राष्ट्रांचा आयातनिर्यात व्यापार ठप्प होतो. शेवटी अमेरिकन सरकारने स्वतः याठिकाणी जहाजांना विमे द्यायची व्यवस्था करायची वेळ ट्रम्प यांच्यावर आली आहे.

१०. इराण आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे, त्यामुळे त्यांना अमेरिकन इस्राईली हल्ल्यांमुळे होणारी वेदना ही जगाला आर्थिक नुकसानाच्या स्वरूपात जाणवू देणे हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. श्रीमंत अरब राष्ट्रांना टार्गेट करणे आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी रोखून धरणे यांमुळे दररोज जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असलेला अब्जावधी डॉलर्सचा फटका ही इराणच्या राष्ट्र म्हणून अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची रणनीती सिद्ध होत आहे.

हे असे युद्धाचे इकॉनॉमिक्स आणि लॉजिस्टिक्स आपल्या बॉलिवूड सिनेमात दाखवले जात नसल्यामुळे आपल्याकडे बऱ्याच लोकांना युद्ध म्हणजे शूरवीरांची वैयक्तिक हिरोगिरी दाखवायची एक संधी वाटते! प्रत्यक्ष युद्धात तुमचं वैयक्तिक शौर्य जेवढं महत्त्वाचं असतं त्याहून कैकपटीने अधिक महत्त्वाचं युद्धाचं इकॉनॉमिक्स आणि लॉजिस्टिक्स असतं याला इतिहास साक्षी आहे. 

बाकी या अशा युद्धामध्ये जीव गमावणाऱ्या निरागस निष्पाप लहान मुलांचे शाप जागतिक अर्थव्यवस्थेला आणि आपल्या सगळ्यांनाच जोपर्यंत पुरेसे चटके देत नाहीत तोपर्यंत युद्धखोर नेत्यांविरुद्ध बोलायची आपली कदाचित इच्छाच होत नसावी! त्यामुळे हे आर्थिक चटके माणूस म्हणून आपल्या निद्रिस्त असलेल्या संवेदनेसाठी महत्त्वाचे आहेत असं म्हणायला हरकत नाही!!

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

लोकशाही आणि लोकसंख्येचा यक्षप्रश्न - भाग ७

लोकशाही व्यवस्थेसमोर आजच्या काळात लोकसंख्येच्या विचित्र गणितांनी जे काही कूटप्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांची साधारण तोंडओळख वाचकांना व्हावी या हेतूने ही लेखमाला योजली आहे! सदर लेखमालेच्या या सहाव्या भागात आपण भारतातील मुस्लिम जन्मदराची वस्तुस्थिती, हिंदू-मुस्लिम लोकसंख्येची तुलनात्मक आकडेवारी, मुस्लिम समाजाशी संबंधित राजकीय-आर्थिक-सामाजिक निर्देशांक, व्होट बँकेचे फायदेतोटे, भारतीय मुस्लिमांचा मुख्य प्रवाहातील सहभाग, इत्यादि मुद्दे विचारात घेणार आहोत...

भाग ७ : मुस्लिम संख्याबळाची वस्तुस्थिती!

भारतीय संदर्भात जन्मदराचा विषय हा बहुतांशी वेळा हिंदू-मुस्लिम संख्याबळाच्या अनुषंगाने चर्चिला जातो. या चर्चेमध्ये बऱ्याचदा सांख्यिकी आणि तथ्ये बाजूला पडून "ते लवकरच ५१% होणार आहेत मग बघा तुमची कशी वाट लागते" हा प्रलयघंटावादच (alarmism) आघाडीवर दिसतो. हिंदुत्ववादी राजकारण किंवा एकंदरच भारतीय राजकारण हे अलीकडे ठराविक समाजाला व्हिलन ठरवून चालवले जात असल्यामुळे लोकसंख्या-जन्मदर यावरील चर्चा/वाद हे विचार सोडून विखाराची वाट धरू लागतात. त्यामुळे यासंदर्भात वस्तुस्थिती नक्की काय आहे, जन्मदराचे आकडे काय आहेत आणि एकंदरच भारतीय मुस्लिमांच्या संख्याबळाचे वास्तव चित्र कसे आहे याची दरवेळी आपल्या राजकारणात ऑप्शनला टाकली जाणारी चर्चा आपण या भागात करणार आहोत! या लेखातील एकंदर विश्लेषण हे इस्लाम या धर्माच्या पोथीपुस्तकांवर आधारित नसून, भारताचा अविभाज्य भाग असलेल्या मुस्लिम समाजाशी संबंधित राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक निर्देशांकांच्या प्रकाशात ही चर्चा आपण करायला घेत आहोत...

१९५१ मध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली तेव्हा हिंदू सुमारे ८४% तर मुस्लिम जवळपास १०% आणि बाकी ६% अन्य धर्मीय/अधर्मीय अशी आकडेवारी नोंदवली गेली होती. १९९१ मध्ये हे प्रमाण ८२% - १२% - ६% अशा स्वरूपात नोंदवले गेले. २०११ मध्ये ते प्रमाण बदलून ८०% - १४ % - ६%  असे झाले. या निरीक्षणांच्या कालावधीत भारतीय लोकसंख्या ही १९५१ मधील ३६ कोटीवरून १९९१ मध्ये ८५ कोटी आणि २०११ मध्ये १२१ कोटी इतकी वाढली ही बाब इथे लक्षात घेतली पाहिजे. २०२१ ची शासकीय जनगणना अजून झालीच नाही  तरी Pew Research Center सारख्या नामांकित खासगी संस्थांच्या अंदाजानुसार त्यादरम्यान हे धार्मिक लोकसंख्येचे गुणोत्तर साधारण ७९% - १५ % - ६% अशा प्रमाणात असेल. याचा अर्थ भारताची लोकसंख्या वेगाने वाढत असताना, भारताच्या हिंदू - मुस्लिम गुणोत्तरात लक्षणीय म्हणावे एवढे बदल झाले आणि ते एकाच दिशेने झाले ही वस्तुस्थिती आहे. 

https://www.pewresearch.org/religion/2021/09/21/religious-composition-of-india/

आता याचा लोकसंख्येतील बदल घडवण्यामागे जन्मदर म्हणजे Total Fertility Rate (TFR) कसा कारणीभूत असतो आणि त्याचे सांख्यिकी निकष काय याबद्दल या लेखमालेत याआधी लिहून झालं आहे! त्यानुसार इथेही जन्मदराचे आकडे आपल्याला लोकसंख्येतील बदल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. National Family Health Survey (NFHS) च्या आकडेवारीनुसार १९९२-९३ मध्ये हिंदू आणि मुस्लिम जन्मदर हे अनुक्रमे ३.३ आणि आणि ४.४ असे होते. म्हणजे तब्बल दर प्रजननक्षम वयोगटातील महिलेमागे सरासरी १.१ इतका फरक तेव्हा या दोन समाजांच्या जन्मदरात नोंदवला गेला होता. जन्मदरातील ही लक्षणीय तफावत स्वातंत्र्यानंतर हिंदू-मुस्लिम लोकसंख्येत झालेल्या बदलांची कारणमीमांसा करायला उपयुक्त ठरते.

https://www.pewresearch.org/religion/2021/09/21/religious-composition-of-india/

यानंतर, म्हणजे भारतात आर्थिक सुधारणा लागून होऊन त्यामुळे वेगाने झालेल्या आर्थिक प्रगतीच्या दशकानंतर, २००५-०६ मध्ये हिंदूंचा जन्मदर २.६ पर्यंत कमी झाला, तर मुस्लिम जन्मदर ३.४ इतका नोंदवला गेला. म्हणजे आर्थिक प्रगतीबरोबरच या जन्मदरांतील तफावत घटून दर प्रजननक्षम वयोगटातील महिलेमागे सरासरी ०.८ इतकी झाली. तोच ट्रेंड कायम ठेवत NFHS ने केलेल्या पाचव्या सर्वेमध्ये हिंदू १.९४ तर मुस्लिम २.३६ असे जन्मदर २०१९-२१ या कालावधीत नोंदवले गेले. याचा अर्थ सध्याच्या उपलब्ध आकड्यांनुसार ही तफावत ०.४२ इतकी आहे. म्हणजे भारताने १९९१ नंतर केलेल्या आर्थिक प्रगतीचा प्रभाव हिंदू जन्मदरावर पडला तसाच तो मुस्लिम जन्मदरावरही पडून १९९१नंतरच्या तीन दशकांत हा फरक मोठ्या प्रमाणात घटला आहे. इथे वर उल्लेखलेले लोकसंख्येचे नोंदवलेले आणि अंदाजे आकडे याला दुजोरा देतात हे आपल्या लक्षात येईल..

https://healthnutritionindia.in/reports/documents/35/NFHS-5_INDIA_REPORT.pdf

आता आर्थिक परिस्थितीचा विचार करता NFHS ने केलेल्या पाचव्या सर्वेमध्ये उपलब्ध माहितीनुसार हिंदू आणि मुस्लिम समाज संपत्तीच्या वितरणाबाबत बऱ्यापैकी सारखे असल्याचे लक्षात येते. मुस्लिम समाज हिंदूंच्या तुलनेत शहरी भागात जास्त प्रमाणात केंद्रित असल्याचे चित्र आपल्याला २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून बघायला मिळते. त्यामुळे मुस्लिम - हिंदू संख्याबळाचे गुणोत्तर हे शहरी भागात ग्रामीण भागाहून जास्तीचे असल्याचा प्रकार आढळून येतो. शिक्षणाच्या बाबतीत मात्र मुस्लिम समाजाचे आकडे हिंदू समाज आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीय प्रमाणात वाईट असलेले बघायला मिळतात. २०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिम साक्षरता दर हा ६८.५४% इतका नोंदवला गेला होता. यावेळी राष्ट्रीय सरासरी ७२.९८% इतकी होती. याच जनगणनेमध्ये ख्रिश्चन, जैन, पारसी आणि शीख या धार्मिक अल्पसंख्यांक समाजांचा साक्षरता दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे ही गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी आहे. 

https://healthnutritionindia.in/reports/documents/35/NFHS-5_INDIA_REPORT.pdf

NFHS ने केलेल्या पाचव्या सर्वेमध्ये उपलब्ध माहितीनुसार मुस्लिम महिलांबाबत साक्षरतेची स्थिती अन्य धार्मिक समाजांच्या तुलनेत चिंताजनक असल्याचे निरीक्षण याठिकाणी करता येईल. २०१९-२१ मध्ये शालेय शिक्षण (किमान इयत्ता नववीपर्यंत) पूर्ण करण्याचे प्रमाण हिंदू महिलांच्या बाबतीत ५०.६% इतके तर मुस्लिमांच्या बाबतीत ४१.६ इतके आढळून आले. याच कालावधीत ख्रिश्चन महिलांमध्ये हे प्रमाण ६२.१% तर जैन महिलांच्या बाबतीत तब्बल ८९.५% इतके होते ही बाब लक्षात घेतल्यास मुस्लिम महिलांची शिक्षणाची स्थिती नीट लक्षात यायला मदत होते. जन्मदर या विषयाशी या आकडेवारीचा घनिष्ट संबंध आहे ही बाब इथे लक्षात घेतली पाहिजे!

अल्पवयीन मातृत्वाचे प्रमाण म्हणजे Teenage Pregnancy & Motherhood या निकषावर NFHS ने केलेल्या पाचव्या सर्वेमध्ये मुस्लिम समाजात १५ ते १९ वयोगटात सर्वाधिक म्हणजे ८.४% इतके प्रमाण नोंदवले गेले आहे, हिंदूंच्या बाबतीत हा दर ६.५% इतका नोंदवला गेला. हे प्रमाण कमी असलेल्या अल्पसंख्यांक समाजांमध्ये बघायचं झालं तर शीख  २.८%, बौद्ध ३.७% आणि जैन १.१% अशाप्रकारची आकडेवारी बघायला मिळते. याचा अर्थ राष्ट्रीय सरासरी, हिंदूंची आकडेवारी आणि अन्य अल्पसंख्यांक समाजांची प्रगती अशा तिन्ही बाबतीत तुलना केल्यास मुस्लिम महिलांची स्थिती चिंताजनक असल्याचे आपल्याला या पाचव्या आरोग्य सर्वेमधून लक्षात येईल.

https://healthnutritionindia.in/reports/documents/35/NFHS-5_INDIA_REPORT.pdf

एखाद्या समाजातील महिलांची साक्षरता, आरोग्य, स्वातंत्र्य आणि एकूणच जीवनमान सुधारणे हा जन्मदर कमी करण्याचा जगभरात सिद्ध झालेला मार्ग आहे हे आपण या लेखमालेत याआधीच्या भागांत दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती आणि पाश्चात्य देशांची उदाहरणे घेऊन समजून घेतलं आहे. त्यामुळे भारतीय मुस्लिमांचा तुलेनेने जास्त असलेला जन्मदर आणि भारतीय मुस्लिम महिलांची साक्षरता-आरोग्य-स्वातंत्र्य याबाबतीत नोंदवलेली चिंताजनक स्थिती यांचा असा स्पष्ट सहसंबंध दिसण्यात काही नवल नव्हेच! मुस्लिमांवर असलेला धर्मवादाचा तुलनेने अधिकचा पगडा, प्रतिगामी विचारांचे प्रभुत्व आणि याचा परिपोष करणारे भारतीय राजकारण हे घटक याला जबाबदार आहेत.

भारतीय राजकारणातील सावरकरी हिंदुत्ववादाची बाजू ही आपल्या एकंदर विचारसरणीचा रोख आणि रोष मुस्लिमांवर ठेवूनच काम करत असते हे काही वेगळं सिद्ध करण्याची गरज नाही. खुद्द सावरकर किंवा त्यानंतरचे सर्वच हिंदुत्ववादी नेते याबाबतीत चढत्या क्रमाने मांडणी करत गेले आहेत. भाजप असेल, शिवसेना असेल किंवा मनसे असेल, यांच्या नेत्यांनी वेळोवेळी अंगिकारलेले मुस्लिमांना टार्गेट करून हिंदूंची मतं मागायचे धोरण काही आपल्यापासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे असे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असताना किंवा स्थानिक पातळीवर प्रबळ असताना मुस्लिमांना सापत्नभावाने वागवले जाण्याचे प्रकारही साहजिकच आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. 

दरवेळी नवनवे मुद्दे फक्त मुस्लिम समाजाला व्हिलन ठरवण्यासाठी कसे उचलले जातात याचं एक चपखल उदाहरण म्हणजे अलीकडे महाराष्ट्रात झालेला मशिदीवरील बोंग्याचा वाद... ध्वनिप्रदूषण कमी करणे हा चांगलाच कार्यक्रम आहे. मात्र एकीकडे आपले हिंदुत्ववादी ढोलताशे, डॉल्बीडीजे आणि फटाके सुरूच ठेवायचे, आणि दुसरीकडे बोंगे उतरवायची आंदोलने करून राडा घालायचा असं जाहीर दुटप्पी धोरण याप्रकरणी हिंदुत्ववादी पक्षांचे नेते राबवत होते. या नेत्यांना स्वतःच्या सभांचे कर्णे चालतात, स्वतःच्या पाळीव गुंडांनी उर्फ कार्यकर्त्यांनी चालवलेले डॉल्बीडीजे आवडतात, स्वतःच्या स्वागताला लावलेल्या फटाक्यांची माळ गोड वाटते आणि मशिदीच्या बोंग्याच्या बाबतीत मात्र यांच्या कानांचे पडदे नाजूक होतात! मग ठरवून निवडणुकीआधी मशिदीसमोरून मोर्चे काढणे आणि तिथे आपले लाऊडस्पीकर नेऊन हनुमान चालिसा वाजवून आम्ही कशी मुस्लिमांची जिरवतो याची मर्दुमकी मिरवणे हे सगळं या लबाड नेत्यांना आजकाल अगदी सवयीचं झालं आहे!!

दुसऱ्या बाजूला ज्यांनी स्वतःला मुस्लिमांचे कैवारी म्हणवलं त्या कॉँग्रेसी किंवा समाजवादी राजकरणानेही मुस्लिमांचं एक समाजगट खऱ्या अर्थाने हित चिंतण्यात फार कमी रस दाखवला ही वस्तुस्थिती आहे. समजा तुमचा एखादा मित्र प्रमाणाबाहेर दारू पिऊन नशेच्या आहारी जात असेल तर तुम्ही त्याला अजून मोफत दारू पाजायला जाल का? तसं केल्याने त्या मित्राची आपल्यावर चांगली मर्जी राहील पण मित्र म्हणून त्याचं हित चिंतायला आपण नालायक ठरणार हे स्पष्ट आहे! मुस्लिम समाजाला वेळोवेळी धर्मवादी, प्रतिगामी आणि कट्टर मानसिकतेकडे लोटण्यासाठी हे मुस्लिम व्होट बँकेचे लाभार्थी असलेले  कॉँग्रेसी किंवा समाजवादी राजकारणी सदैव तत्पर राहिलेले आहेत. बुरखा असेल, तलाक असेल किंवा विवाहाच्या वयोमर्यादेचा विषय असेल, या बाबतीत कॉँग्रेसी/समाजवादी नेत्यांनी मुस्लिम समाजाला सुधारण्याची इच्छाही फारशी दाखवलेली नाही. 

एकीकडे हिंदू कोड बिल आणायचं श्रेय घ्यायचं आणि दुसरीकडे मुस्लिम महिलांना धर्माच्या जोखडाखाली ठेवण्याचं "त्यांना स्वातंत्र्य आहे!" म्हणून समर्थन करायचं अशी लबाडी या लोकांनी वेळोवेळी दाखवली आहे. मुस्लिम व्होट बँक ही जणू आपल्या बापाची जहागीर आहे अशा माजात हे कॉँग्रेसी/समाजवादी पक्षांचे नेते मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या एमआयएमसारख्या लहान पक्षांना भाजपची बी टीम म्हणून हिणवत असतात! हे पक्ष आणि नेते मुस्लिम समाजाचे हितचिंतक नाहीत, मित्र तर मुळीच नाहीत, ते फक्त आजच्या १५% मुस्लिम व्होट बँकेचे लाभार्थी आहेत... 

अशा दुहेरी कचाट्यात अडकलेल्या मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. २०२४ मध्ये निवडून आलेल्या लोकसभेत मुस्लिम समाजाचे खासदार ४.५% हून कमी उरले आहेत. १९९९ मध्ये हा आकडा ६% च्या जवळ तर २००४ मध्ये ६.५%च्या घरात होता. आजच्या सत्ताधारी भाजपला अख्ख्या देशातील १५% म्हणजे जवळपास बावीस कोटी लोकसंख्येपैकी एकही माणूस खासदार म्हणून निवडून आणावासा वाटला नाही! पूर्वी भाजप शाहनवाज हुसेन किंवा मुख्नतार अब्बास नक्वी यांच्यासारखे लोक निदान शोभेसाठी तरी सोबत ठेवत असे. आता त्याचीही गरज त्यांना वाटेनाशी झाली आहे! आज सत्ताधारी आघाडीमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नाही! एकाही मुस्लिम माणसाने भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतली नाही अशी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिली वेळ आहे!!

https://www.thehindu.com/data/data-eighteenth-lok-sabha-has-lowest-share-of-muslim-mps-in-six-decades/article68285104.ece

भारतात प्रातिनिधिक लोकशाही आहे. तरी या देशातील बावीस कोटी लोकसंख्येला किमान एक जनप्रतिनिधी द्यायची इच्छाही आता सत्ताधारी गटाला राहिलेली दिसत नाही! पुरोगामित्चावा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्यातही हीच परिस्थिती आहे. आपल्या सध्याच्या विधानसभेत मुस्लिम प्रतिनिधी जेमतेम ३.५% इतके उरले आहेत. इथेही सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपकडे एकही मुस्लिम आमदार नाही. म्हणजे किमान अपवाद सिद्ध करायला किंवा शोभेसाठी एकतरी आणावा अशीही गरज त्यांना आता वाटत नसावी! एखाद्या समाजगटाच्या बाबतीत असा प्रतिनिधित्वाचा ऱ्हास होणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर समस्या आहे.

एकेकाळी महाराष्ट्रात बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री होऊ शकत होते. एकेकाळी अब्दुल कलाम भाजप/रालोआकडून भारताचे राष्ट्रपती व्हायला त्यांचं मुस्लिम नांव आडवं येत नसे. आज प्रगत देशांचा विचार केला तर अमेरिकेत जोहरान ममदानी न्यू यॉर्कचा महापौर होतो. तिकडे युरोपात सादिक खान तब्बल दशकभर लंडनसारख्या शहरात ती जबाबदारी सांभाळतो. या दोन्ही शहरांच्या महापौर पदासाठी मुस्लिम किंवा अल्पसंख्यांक नांव नसणे हा निकष ठेवलेला नाही ही गोष्ट यातून अधोरेखित होते. त्याचवेळी भारतात मात्र सत्ताधारी पक्ष बावीस कोटी मुस्लिम समाजातून एकही खासदार देऊ इच्छित नाही! सध्याच्या भारताचा १५% भाग असलेल्या समाजगटाला किमान एक मंत्री द्यावा इतकी तयारीही सध्याची सत्ताधारी आघाडी दाखवू इच्छित नाही...

हिंदुत्ववाद्यांचा दिवसेंदिवस आक्रमक होत जाणारा सूर सहन करणाऱ्या आजच्या भारतीय मुस्लिम समाजाने आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर आधुनिक विचारांचे, प्रगतीच्या वाटेवर नेणारे नेतृत्व का नाही याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. धर्मवादाच्या पोथीची अफू पाजून आपल्या समाजातील युवा पिढी बरबाद करू पाहणारे मुल्लामौलवी हेच आपले वैचारिक पुढारी म्हणून खपवून घेण्याची किंमत आज हा समाज भोगतो आहे. स्वतःचे आधुनिक विचारांचे नेतृत्व निर्माण न करता, राजकीयदृष्ट्या अगतिक होऊन आपल्या संख्याबळाचे लाभार्थी असलेले लबाड नेते मोठे करणे ही या समाजाची मोठी समस्या होऊन बसली आहे! आपले खुशमस्करे हेच आपले मित्र समजण्याची घोडचूक भारतीय मुस्लिम करून बसला आहे.

स्वतंत्र भारताची 'आयडिया ऑफ इंडिया' ही या खंडप्राय देशाला एकत्र एकसंध ठेवणारी महत्त्वाची साखळी आहे. गांधी - नेहरू - पटेल यांनी मांडलेली ती आयडिया ऑफ इंडिया हा भारत आणि पाकिस्तानमधला महत्त्वाचा फरक आहे. आपल्या संविधानात प्रतिबिंबित झालेली ती सहिष्णु आधुनिक मूल्ये ही प्रचंड विविधता असूनही एकसंध असलेला देश म्हणून - जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली ओळख अजूनपर्यंत टिकून राहण्याचं महत्त्वाचं कारण आहेत. अशावेळी आपल्या देशाचा अविभाज्य भाग असलेल्या मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हे त्या समजाबरोबरच आपल्या सर्वांच्याच हिताचं आहे. मुख्य प्रवाहातून दूर लोटले गेलेले असे समाजगट धार्मिक कट्टरतेला आणि फुटीरतेला बळी पडण्याचा धोका अधिक असतो ही बाब या देशाने वेळीच ओळखण्याची गरज आहे. 

आज तुमच्या गावात शहरात आजूबाजूला असणारे मुस्लिम ही काही औरंगजेबाची सेना नाही. आज भारतीय लोकशाहीचे घटक असलेले मुस्लिम हे कोण्या सुलतानाचे सरदार किंवा बादशाहचे वारस नसून आपल्यासारखेच या देशाचे नागरिक आहेत ही साधी जाणीव कट्टर हिंदुत्ववादाच्या फुग्याला टाचणी लावायला पुरेशी आहे! अतिरंजित इतिहासाचा चिखल चिवडून वर्तमानात आपल्या देशातील एका समाजगटाला सरसकट खलनायक ठरवणे ही करंटी वृत्ती या देशाच्या संविधानाशी आणि आयडिया ऑफ इंडियाशी अजिबात जुळणारी नाही ही गोष्ट ठणकावून सांगायची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे! भारताची १५% लोकसंख्या प्रतिगामी धर्मवादाच्या जोखडाखाली आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या अभावी तशीच राहू देणे यात राष्ट्र म्हणून आपलं अहित आहे ही जाणीव सुशिक्षित सुसंस्कृत भारतीय नागरिक या नात्याने आपल्याला होण्याची आवश्यकता आहे. 

भारतीय मुस्लिमांच्या या वस्तुस्थितीचे भान आणि त्यांच्याबाबतीत बंधुभावाची जाणीव सुशिक्षित भारतीय नागरिकांमध्ये पुन्हा एकदा नव्याने वाढीला लागेल, आपली आयडिया ऑफ इंडिया मुस्लिमांना परके म्हणून अव्हेरून टाकणार नाही अशी आशा व्यक्त करून या लेखमालेचा आजचा भाग याठिकाणी आवरता घेत आहे! या लेखमालेच्या पुढील भागात आपण भारतीय संघराज्यवाद आणि डीलिमिटेशन हे विषय चर्चेला घेणार आहोत, तोपर्यंत रजा घेतो...