बुधवार, १२ एप्रिल, २०१७

हॅरी पॉटरच्या दुनियेत : Severus Snape

हा आहे Severus Snape !

पहिल्यांदा आपल्या शाळेतील खडूस मास्तराची आठवण करून देणारा, दुष्ट-गूढ-क्रूर वाटणारा- Neville Longbottom वर रॅगिंग करणारा- Hermoine ला टोमणे मारणारा, हॅरीचा द्वेष करणारा - थोडक्यात 'डोक्यात जाणारा' - जादुई रसायने (Potions) शिकवणारा मास्तर म्हणजे हा स्नेप !
पण माणसं पांढरी किंवा काळीच असतात का ? अशी गूढ- काळ्या सावलीसारखी दिसणारी माणसं व्हीलनच असतात का ? इथे Severus Snape आपल्या अशा Binary दृष्टीला स्तिमित करून जातो ! स्नेप ही मी पाहिलेल्या सर्वोत्तम व्यक्तिरेखांपैकी एक आहे !! तो व्हिलन आहे का हिरो हे शेवटपर्यंत कळत नाही ... रोलिंग बाईंनी लिहिलेली आणि Alan Rickman ने पडद्यावर जिवंत केलेली - intense हा शब्द लाजेल अशी अफाट व्यक्तिरेखा...
कदाचित स्नेप नसता तर हॅरी पॉटरची गोष्ट आणि पिक्चर हे टॉम अँड जेरी सारखे लहान मुलांपुरतेच राहिले असते ! स्नेप, सिरीयस ब्लॅक सारख्या व्यक्तिरेखांमुळे हॅरी पॉटर सिरीज mature बुद्धीलाही भुरळ घालते !
स्नेपचं बालपण दुःखद असतं ! आईबाबांच्या वेगळे होण्याने त्याच्या बाल्याचा चुराडा केलेला असतो... त्याच्यातील Talent तरीही लपत नाही... फार लहान वयातच तो होग्वार्ट्झमध्ये जादू-मंत्रात पारंगत होतो ! जेम्स पॉटर, सिरीयस इ. असलेल्या Maruaders ने केलेल्या रॅगिंग-कम-चेष्टेमुळे स्नेप आतून कायमचा दुखावतो.
त्याच्यातील गुणवत्तेला वाळवंटातील रात्रीसारख्या रुक्ष-गूढ आयुष्याचा शाप असावा ! या वाळवंटात आपल्या तेजाने तळपणाऱ्या स्नेपला गारवा-आसरा-ओलावा सापडतो तो लिली पॉटरमध्ये ! लिली आणि स्नेप एकमेकांकडून बरंच काही शिकतात... पण...
स्नेप रागात किंवा दंभाचा आविष्कार असेल म्हणून - एकदा Mudblood नांवाचा Rascist-घृणास्पद-वंशवर्चस्ववादी शब्द वापरतो... कदाचित स्नेप तसाच असेल ! शुद्ध रक्ताची झिंग असलेला... किंवा तो फक्त एक भावनातिरेक असेल... पण यामुले स्नेप लिलीच्या संवेदनेला कायमचं ठिगळ लावतो. आणि आपल्या आयुष्यातील एकमेव जिव्हाळ्याचं स्थान मृगजळ बनताना बघत बसतो...
स्नेप अशा प्रकारच्या isolation मुळे काळ्या विद्यांकडे झुकतो ! Death Eater लोकांबरोबर दोस्ती करतो. टॉम रिडल्स सारखंच - एक विशेष-टोपण नांव किंवा गूढ बिरुद स्वतःला चिकटवतो !! स्नेप 'Half Blood Prince' म्हणतो. नवे मंत्र शोधतो. काळ्या बाजूकडे झुकत जातो...
पण तेवढ्यात त्याचं आयुष्य अजूनच छिन्नविच्छिन्न करणारी घटना घडते. Voldemort चा Avada Kedavra नांवाचा हमखास जीव घेणारा शापमंत्र लहानग्या हॅरीचा घास घेणार असतो ! तेवढ्यात लिली पॉटर आपल्या बाळाला वाचवते-आपल्या जीवाचं बलिदान देऊन ! तिच्या बलिदानापुढे तो मृत्यू-मंत्र फिका ठरतो, आणि परत फिरतो - Voldemortचे तुकडे करतो... Horcruxes मुळे Voldemort परत येणारच असतो. हॅरीला The Child who survived ची उपाधी मिळते, मातृकवच मिळतं... मात्र ....
गतप्राण लिलीसमोर त्या लहानग्या हॅरीपेक्षा जास्त रडणारा- नियतीने मृगजळसुद्धा हिरावून नेल्याचे अश्रू ढाळणारा- हाफ ब्लड प्रिन्स !
स्नेपचं मृगजळसुद्धा नियती हिरावून घेऊन गेलेली असते... स्नेप कायमचा बदलतो. Voldemort नांवाच्या अजेय सैतानाला हरवण्यासाठी आयुष्य झोकायची मानसिक तयारी स्नेप करतो... Dumbledore कडे जाऊन आपले अश्रू मोकळे करतो- डबल एजंट बनून आपल्या नव्या लक्ष्याचा वेध घेण्याची प्रतिज्ञा करतो. हॅरीचे डोळे लिलीसारखे आहेत हे सांगून चाणाक्ष Dumbledore हळुवार पणे Snape च्या काळजाला हात घालतो ! आता स्नेप हॅरीला वाचवणार असतो- त्यासाठी वाट्टेल ते करून- तरीही कोणालाही ते जाणवू न देता !! लिलीचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून - स्नेप आपल्या रखरखीत आयुष्याला फुफाट्यात झोकायला तयार होतो...

Voldemort नांवाच्या मृत्यू समोरही न डगमगता उभा राहणार, खोटं बोलण्याची सत्य-प्रतिज्ञा न तोडणारा स्नेप
स्नेपला Dumbledore चा जीव घ्यावा लागतो, Voldemort ची साथ द्यावी लागते, Bellatrix च्या तिरकस टोमण्यांना उत्तर करत आपली निष्ठा त्या Dark Lord कडे सिद्ध करावी लागते... Voldemort हा सर्वश्रेष्ठ मनकवडा- Legilimens पैकी एक असतो. त्याच्या समोर खोटं बोलणं जवळपास अशक्य असतं ! पण Snape तितकाच सर्वोत्तम मनोनिग्रही - सर्वश्रेष्ठ Occlumens - असतो ...
नगिनीच्या हल्ल्याने घायाळ होऊन- हॅरीच्या डोळ्यात लिलीची आठवण बघत- Dumbledore ने सोपवलेले शेवटचे काम पूर्ण करणारा स्नेप
Voldemort ला फक्त हॅरी हरवत नाही ! लिली आणि स्नेपच्या अमर बलिदानांचा, Dumbledore च्या सात्विक-विचक्षण नियोजनाचा रेटा- Tom Riddles उर्फ Lord Voldemort च्या मृत्यूला गिळणाऱ्या महत्त्वाकांक्षेला आणि त्याच्या अद्वितीय ताकदीला - मात देऊन जातो !!
हॅरी पॉटर सीरिज मनात कायमचं स्थान मिळवून जाते- ती Snape आणि त्याच्यासारख्या अप्रतिम व्यक्तिरेखांमुळे, Voldemort च्या राक्षसी उंचीमुळे आणि त्याला हरवणाऱ्या Golden Trio च्या हिंमतीमुळे !!



(*सर्व छायाचित्रे गूगल इमेजेसवरून घेतली आहेत. )

रविवार, ८ जानेवारी, २०१७

संविधान : गल्लत आणि गफलत

काल टीव्ही बघत होतो ! त्यात मुस्लीम मोर्चाची बातमी बातमी चालली होती. त्यात एक 'युवा आंदोलक खातून' म्हणाली की 'शरीया हमारा संवैधानिक अधिकार है !"... बरेच दिवसांपासून संविधान म्हणजेच आपल्या राज्यघटनेबद्दल अनेक गोंधळ ऐकत आलो आहे, वाचत आलो आहे. संविधानातील तरतुदींचे बरेच विपर्यास, अनेक मतलबी अर्थ लावण्यापासून, ते संविधान हा कॉपीचा प्रकार असून देशविघातक आहे इथपर्यंत विविध गल्लत-गफलत आपल्या देशात चालते ! यामध्ये बऱ्याचदा अज्ञानापोटी किंवा त्याहून जास्तवेळा ढोंगीपणाचा हात असतो. या सगळ्याचा परिपाक म्हणून संविधानाच्या तरतुदींबद्दल, त्याच्या रचनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींबद्दल, आणि एकूणच संविधानासंदर्भात अनेक गैरसमजुती, खोटे अभिनिवेश पसरले आहेत. संविधानाबद्दलच्या अशाच विचित्र गैरसमजांचे एक एक करून खंडन करण्याचा आणि संविधानाबद्दलच्या मुलभूत 'कन्सेप्ट क्लीअर' करण्याचा हा एक प्रयत्न...

Image Credits - Wikipedia

या लेखात संविधानाबद्दलचे गैरसमज किंवा दिशाभूल करणारा मुद्दा/आक्षेप आधी मांडून मग त्याचे थोडक्यात खंडन आपण बघणार आहोत. अशा एकूण मुद्द्यांपैकी पैकी लोकप्रिय आणि अगदीच मुलभूत स्वरूपाच्या जास्तीत जास्त मुद्द्यांविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न राहील. आता एक एक करून मुद्दे आणि खंडन करण्याकडे वळू -


  1. "संविधान बदलण्याचे षड्यंत्र चाललेले आहे !" - ज्याला संविधान या संकल्पनेविषयी मुलभूत माहिती आहे, त्याला हा आक्षेप/ही Conspiracy Theory हास्यास्पद वाटल्याशिवाय राहणार नाही. संविधान म्हणजे कुराण नव्हे, जे बदलणे म्हणजे पाप होईल ! संविधान काही पवित्र गाय नव्हे, ते एक बदलाचे हत्यार आहे. हे घटनाकारांनाही अभिप्रेत होतेच. त्यामुळे बदल चांगला की वाईट यावर चर्चा होऊ शकते, किंबहुना व्हावीच; परंतु संविधानात सुधारणा करणे म्हणजे षड्यंत्र असा समाज साफ चुकीचा आहे.
  2. "संविधान आमच्या जातीचे आहे, त्याला हात लावाल तर खबरदार !" - हे खरंच गंभीर प्रकरण आहे. डॉ आंबेडकर हे संविधान सभेच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होते. ते दलितांचे नेतेही होतेच. पण यावरून संविधान हे दलितांचे आहे, त्याला हात लावाल तर खबरदार वगैरे भूमिका घेणे विचित्र आहे ! (म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. चंद्रावर खड्डे आहेत. म्हणून पृथ्वी खड्डयाभोवती फिरते अशातला प्रकार झाला हा !!)  संविधान हे देशाचे आहे. त्याला हात लावणे म्हणजे त्याच्या मूलभूत तत्त्वांनाच कोणी हानी पोचवत असेल तर विरोधच असावा. पण संविधानात सुधारणा/घटनादुरुस्ती करणे म्हणजे 'आमच्या' अस्मितेला धक्का हे समीकरण अजब आहे.
  3. "संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले/रचले." - असा समाज असणारे अनेक सुशिक्षित मी बघितले आहेत ! संविधान म्हणजे काही कादंबरी नाही जी एक माणूस बसून लिहून टाकेल !! डॉ. आंबेडकर यांचे कार्य, संविधान सभेतील योगदान मोलाचेच आहे. पण म्हणून 'एकट्या आंबेडकरांनी संविधान लिहिले/रचले' असा समाज बाळगून बसणे म्हणजे शेखचिल्लीचा वारसा चालवण्याचा प्रकार आहे.  असा समाज हा नेहमीच गैरसमज असतो असे नाही. बऱ्याचदा तो अभिनिवेश किंवा अपराधगंड असू शकतो. म्हणजे आक्रस्ताळे दलित नेते तो अभिनिवेश म्हणून वापरतात. तर हल्लीचे काही हिंदुत्ववादी आंबेडकरांच्याबद्दल  अकारण अपराधगंड बाळगून असल्यामुळे, त्यांची स्तुती करताना वास्तवाचे भान ठेवत नाहीत ! मुळात संविधान सभेमध्ये अनेक कमिटी होत्या, त्यापैकी Drafting Committee चे डॉ. आंबेडकर अध्यक्ष होते. हे स्थान महत्त्वाचे नक्कीच आहे. पण म्हणून उरलेल्या कमिटी या कमी महत्त्वाच्या उरत नाहीत ! उदाहरणार्थ - Union Powers Committee, State Committee आणि Union Constitution Committee चे अध्यक्ष पंडित नेहरू होते. तर मुलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक विषयांच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते. सदर कमिटीच्या दोन सब-कमिटी होत्या. त्यातील Fundamental Rights Committee चे अध्यक्ष आचार्य कृपलानी तर, Minorities Sub-Committee चे अध्यक्ष एच.सी.मुखर्जी हे होते. अशाप्रकारे संविधानाची रचना हे एक टीम-वर्क होते, एकट्याने केलेले कादंबरीलेखन नाही !! खुद्द आंबेडकरांना Drafting Committee चे अध्यक्ष बनवण्यात  कॉंग्रेसचा म्हणजे गांधी-नेहरू-पटेल यांच्या राजकीय समजूतदारपणा आणि गुणग्राहकतेचा वाटा होता हे संविधान सभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेतल्यास सहज समजेल. त्यामुळे आंबेडकरांचे कार्य मोलाचेच आहे, पण आंबेडकरांनी घटना रचली हा दावा तर खुद्द आंबेडकरांनीही धुडकावला असता !!
  4. "संविधान म्हणजे फक्त कॉपी आहे !" - संविधान सभेसाठी निवडणुका झाल्या, जवळपास ११ अधिवेशने झाली, १०-१२ महत्त्वाच्या कमिटी होत्या... इतकं सगळं फक्त कॉपी करण्यासाठी कोण का करेल !!! हा आरोप राजीव दीक्षित आणि कंपनी किंवा तत्सम Conspiracy Theories च्या चाहत्यांचा आवडता आणि नेहमीचा हुकुमाचा एक्का आहे ! (आता तो जोकरपेक्षा हास्यास्पद आहे हा भाग निराळा !!)  १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायद्याची कॉपी म्हणजे घटना असा या बाजूचा ग्रह(किंवा आग्रह !) आहे. हा प्रकार अजून विचित्र आहे ! १९३५चा कायदा हा ब्रिटीश संसदेने केलेला, भारताच्या प्रशासनिक सोयीचा एक कायदेशीर भाग होता ! (त्यात खरी प्रांतिक स्वायत्तता वगैरे अंतर्भूत होती की नव्हती तो भाग अजून वेगळा) भारताची राज्यघटना हा एका स्वतंत्र मानवसमुहाने स्वीकारलेला ठराव होता ! राज्यघटनेनंतर भारत हे स्वतंत्र राष्ट्र, सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून अस्तित्त्वात आले. १९३५ चा कायदा झाल्यानंतर असं काहीच झालं नाही ! हे खरं आहे की १९३५ च्या कायद्याचा वापर घटनेचा स्त्रोत-संदर्भ म्हणून केला गेला आहे. त्याचं कारण भारतासारख्या खंडप्राय देशाची असलेली शासनव्यवस्थाच स्वतंत्र भारताला अंगीकारून आवश्यक तिथे बदलायची होती. याच कारणासाठी Transfer of Power नांवाचा करार करण्यात आला होता. अन्यथा, ब्रिटीश सत्ता निघून गेल्यानंतर System Vacuum म्हणजे व्यवस्था-पोकळी निर्माण होऊन, आधीच फाळणीने संकटात असलेली अखंडता अजून धोक्यात आली असती. मात्र राजीव दीक्षित आणि कंपनी तसेच अन्य जहाल राष्ट्रवादी म्हणवणारे हे समजून घेत नाहीत. त्यांच्या मते सर्व ब्रिटीश व्यवस्था उचलून फेकून द्यायला हवी होती ! पण जर असं झालं असतं तर आज या लोकांना भजायला, पुजायला 'भारत' उरलाच नसता !! एखादा मानवसमूह जेव्हा राष्ट्र म्हणून स्वतंत्र होत असतो तेव्हा असा आक्रस्ताळेपणा करून चालत नाही. असलेला ढाचा स्वीकारून, सत्ता स्थिर करून आपली स्वतंत्र धोरणे आखावी लागतात. अन्यथा सगळ्याचाच विनाश होऊन, अराजक नांवाची चेटकीण त्या नवजात स्वातंत्र्याला गिळून टाकायला जिभल्या चाटत बसलेलीच असते ! भारताचे तसे हाल झाले नाहीत, यामागे नेहरू-पटेल आणि तत्कालीन नेतृत्वाची दूरदृष्टी आणि विवेकबुद्धी आहे. त्यांचे ऋणी असायचे सोडून, उलट त्यांनाच शिव्या देण्याची राजीव दीक्षित छाप राष्ट्रवादीगिरी (!) हे मूर्खांचे चाळे आहेत. भारताची राज्यघटनासुद्धा याच कारणामुळे आधीच्या प्रशासनिक कायद्यांचा आधार घेऊनच बनवली गेली आहे. पण फक्त १९३५ च्या कायद्याची कॉपी म्हणजे राज्यघटना असे मुळीच नाही. विविध देशांच्या राज्यघटनांमधून, भारतीय संविधानात आवश्यक ती मुल्ये, व्यवस्था, संकल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत. अशी गुणग्राहकता हा सद्गुण आहे ! त्यामुळे हा 'कॉपी'वाला आरोप मूर्खपणा आणि द्वेषबुद्धीचे मिश्रण घेऊन जन्मलेला आहे असे दिसते...
  5. "स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आंबेडकरांनी दिली !!" - हा अजून एक स्तुतीदोष आहे ! ज्यात पुन्हा पूर्वी उल्लेखलेल्या दोन बाजू म्हणजे - आक्रस्ताळा दलित अभिनिवेश आणि अपराधगंडपिडीत हिंदुत्व -समाविष्ट आहेत ! वस्तुतः ही तिन्ही मुल्ये फ्रेंच राज्यक्रांतीची जगाला देण आहेत. (आता समतेला मूल्य म्हणावे का, त्याचा अर्थ काय हा गहन वाद आहे !) आंबेडकरांनीही ही मुल्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या अभ्यासातूनच आत्मसात केली असावीत. आंबेडकर या मूल्यांचे कडवे समर्थक होते यात शंकाच नाही. पण स्तुती करताना उगाच बांध फोडून, ती मूल्येच आंबेडकरांनी दिली असे म्हणणे चुकीचेच ठरते.
  6. "संविधानाने आरक्षण आणले, संविधान हा सवर्णांवर अन्याय आहे" - बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करणारी एक सवर्ण मानसिकता अस्तित्त्वात आहे. सोशल मिडियावरही अत्यंत असभ्य भाषेत व्यक्त होणारी ही मानसिकता, सध्याच्या सवर्ण-आंदोलनांच्या काळात, बळावलेली दिसते. एकीकडे घटनेच्या चौकटीत असल्याचा दावा आरक्षण मागायचं, आणि नाही मिळालं तर मग घटनाच नको आम्हाला, असा झुंडवादी पवित्र घ्यायचा हे या मानसिकतेचे लक्षण आहे. इथे बराच घोळ आणि खोटेपणा आहे. सध्याचे दिसणारे आरक्षणाचे स्वरूप हे जास्त करून नव्वदच्या दशकातील मंडल आयोगाचे फलित आहे. संविधान निर्माण झाले त्या काळात आरक्षण ही खरंच गरज होती. त्याविना सामाजिक अस्पृश्यांना  एक प्रकारे पारतंत्र्यातच राहावे लागले असते. त्यानंतरच्या काळात, राजकीय फायद्यासाठी आरक्षणाचा 'लॉलीपॉप' म्हणून वापर झाला, यात आंबेडकरांचा काय दोष ? हा म्हणजे एखादा रुग्ण मात्रेच्या एका चमच्याऐवजी द्राक्षासवाची अख्खी बाटली प्याला, त्यामुळे झिंगला आणि दोष मात्र औषध देणाऱ्या वैद्याला; अशातला प्रकार झाला !!! आरक्षण हा सूड नव्हे, तो एक उपाय आहे. किंबहुना 'होता' ! याची सविस्तर आणि सखोल चर्चा या ब्लॉगवरील आरक्षणासंबंधित लेखमालेत केली आहे. त्यामुळे संविधान हे सवर्णांच्या विरोधातील षड्यंत्र मुळीच नाही. उलटपक्षी भारताला यादवीपासून वाचवण्यात संविधानाचा (आणि आंबेडकरांचाही) मोठा वाटा मात्र नक्की आहे !
  7. "शरिया हा आमचा संवैधानिक अधिकार आहे !" - मुळात हे ज्या मोर्च्याच्या 'युवा' नेत्यांचे म्हणणे आहे, तो मोर्चाच असंवैधानिक कारणांसाठी काढला गेलेला आहे ! धर्मावर आधारित आरक्षण हा संविधानाचा सर्वात मोठा अपमान ठरेल. घटनेच्या Secularism या मुलभूत गाभा-तत्त्वाचा (Core Principle) तो खून ठरेल यात शंका नाही, मग शरिया तर दूरचाच विषय ! खरंतर इस्लामिस्ट लोकांकडून घटनेची ढाल पुढे केली जाने, हा प्रकारच विचित्र आहे !! कारण धर्मपिसाट इस्लामिस्ट लोकांसाठी घटना नाहीच आहे. त्यांच्यासाठी अख्खा पाकिस्तान कापून दिला आहे. घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वात 'समान नागरी कायद्या'चा स्पष्ट उल्लेख आहे. दुर्दैवाने घटना तयार होत असताना, नुकतीच देशाने फाळणी बघितली असताना, असा कायदा किंवा तशी तरतूद करणे घटनाकार मंडळींना धोकादायक तर (राजकीय नेतृत्वाला गैरसोयीचे) वाटले असावे !! परंतु मार्गदर्शक तत्त्वे, तसेच संविधानाचा गाभा असणारे Secularism चे मूल्य 'शरिया' नांवाच्या रानटी, पिसाट गोष्टीला कदापि थारा देणार नाही. इतकेच काय, तर मुस्लीम पर्सनल लॉं बोर्ड नांवाच्या समांतर व्यवस्थेला लवकरात लवकर बरखास्त करणे हेच संविधानाच्या गाभ्याच्या रक्षणासाठी आवश्यक बनले आहे !!

संविधानाबद्दलचे भ्रम, गैरसमज, बुद्धिभेद दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या लेखातून केला आहे. गल्लत, गफलतीचे लोकप्रिय मुद्दे एक एक करून खोडून काढले आहेत. अनेक राजकीय-सामाजिक विषयांच्या चर्चा आणि विवादामध्ये संविधानाचे संदर्भ येत असतात. तेव्हा संविधानाबद्दलच मुलभूत गैरसमज असणे एकंदरच लोकशाही आणि विधायक चर्चेच्या हिताचे नाही. त्यामुळे संविधानाबद्दलचे वरील मुद्दे आणि स्पष्टीकरणे ध्यानात ठेवून, आपण नागरिक म्हणून अधिक सुजाण बनू, हीच अपेक्षा...

- संदर्भ लिंक्स -


गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

भारतातील इस्लामिक बँकिंगची दबकी पावले....

(दिनांक26-Nov-2016 रोजी  मुंबई तरुण भारत साठी लिहिलेला लेख)
भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्याच्या बँकांमध्ये इस्लामिक बँकिंगसाठी स्वतंत्र खिडकी सुरु करण्याचे ठरवले आहे. इस्लामिक बँकिंगची भारतातील सुरुवात होण्यासाठी सुरुवातीला अशा छोट्या स्तरावर ती व्यवस्था अंमलात आणून, तिचा प्रसार वाढवायचे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. गेले काही महिने भारताची रिझर्व बँक ही केंद्र सरकारबरोबर विचारविनिमय करून 'इस्लामिक बँकिंग'ला देशात अधिकृत मान्यता व स्वीकृती देण्याच्या प्रयत्नात  होती. त्याच प्रयत्नांचे पुढचे पाउल म्हणून आता इस्लामिक बँकिंगसाठी भारतीय बँकांमध्ये स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून दिली जात आहे. याआधी जेद्दाहच्या इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेकडून अहमदाबाद येथे भारतातील पहिली शाखा उघडण्याची घोषणा केली गेली होती. अल्पसंख्यांक गटांमध्ये बँकिंगची विकासगंगा पोचावी यासाठीचा हा उपक्रम स्तुत्यच आहे.
मात्र या बँकिंग व्यवस्थेच्या नांवामुळे काही लोकांची फसगत होऊन, या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. मुळात इस्लामिक बँकिंग ही बँकिंग सिस्टीम आहे. या व्यवस्थेत व्याज आकारणी नसते. तर थेट जिथे कर्ज वापरले, त्या धंद्यातील किंवा व्यवसायातील नफ्यामध्ये कर्ज देणारी पतसंस्था म्हणजेच बँक ही वाटा स्वीकारते.
म्हणजे थोडक्यात आधुनिक अर्थशास्त्र आणि फायनान्सच्या भाषेत बोलायचे तर इक्विटी या संकल्पनेवर आधारित पतपुरवठा करणारी व्यवस्था म्हणजे इस्लामिक बँकिंग होय. यामध्ये 'जोखीमयुक्त भांडवल पुरवठा' म्हणजेच Supply of Risk Capital केला जातो. यामागे  इस्लाममध्ये 'व्याजी धंदा' (व्याज - रीबा) हराम असल्याचे कारण आहेच. मात्र या गोष्टीमुळे मुस्लीम वर्ग बँकिंगपासून दूर राहत असल्याचे तज्ञ मंडळींच्या आणि रिझर्व बँकेच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच, खास करून, रघुराम राजन यांच्या कार्यकाळापासून आरबीआयने या गोष्टीकडे सकारात्मकतेने बघायला सुरुवात केली आहे.
कर्ज घेणे/ठेवी ठेवणे ही ऐच्छिक बाब असल्याने सरकार एखाद्याला त्याची सक्ती करू शकत नाही. दुसरीकडे सध्या उपलब्ध असलेले पर्याय ज्यांना धार्मिकदृष्ट्या नकोसे वाटतात ते लोक बँकिंगपासूनच दूर राहताना दिसतात. यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावून तो समाजगट आणि देश दोघांचेही नुकसान होते. त्यामुळे इस्लामिक बँकिंगचा पर्याय खुला करून अशा अल्पसंख्याक लोकसंख्येला बँकिंगच्या प्रवाहात आणणे, हे अर्थव्यवस्था बळकट करणारे ठरू शकेल. आणि मुस्लीम समाजात आर्थिक उन्नती आणि विकास होणार असेल, तर अशा व्यवस्थेला विरोध करण्याचे काही कारण नाही. सध्या अनेक देशांमध्ये या व्यवस्थेला मान्यता असून, तिचा वापर केला जात आहे. वर्ल्ड बँकही तिच्या वापराला मान्यता देते. आणि जगभरातील घसरत चाललेल्या व्याजच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक बँकिंगचा वापर इंग्लंड, हॉंगकॉंग आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या बिगर-मुस्लीम देशांमध्येही वाढत आहे.
इस्लामिक बँकींगला मान्यता देण्यामागे ते व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या स्कॅनरखाली यावेत हाही एक उद्देश आहे. आणि सध्या जर इस्लामिक बँकींग सुरू असेल तर ते थांबवायचे कसे ? उलट वैधता दिल्याने ते व्यवहार नियमित होतील हा विचारच हे विरोधक करताना दिसत नाहीत. नांवावरून, अभ्यास न करता, एखादी  संकल्पना अस्पृश्य मानणे हा बुद्धिवाद नाही. इस्लामिक बँकींगला मान्यता देण्याचा निर्णय हा इहवादी आणि अर्थव्यवस्थेला पोषकच आहे. मात्र अभ्यास न करता, नांव वाचून विरोधाचे झेंडे फडकवणारे हा विचारच करताना दिसत नाही...
इस्लामिक बँकींगला अर्थशास्त्राच्या अज्ञानातून आणि त्याच्या नावाचा फोबिया असल्यामुळे विरोध होत आहे. यामध्ये 'सेक्युलर' या तत्त्वाला बाधा पोचत असल्याचा प्रचार केला जात आहे. मात्र एखादी धार्मिक श्रद्धा किंवा कर्मकांड यांचा थेट स्वीकार राज्यव्यवस्थेने केल्यास 'सेक्युलर' तत्त्वाला बाधा पोचू शकते. मात्र धर्माच्या आणि त्याच्या संबंधित संस्कृतीच्या योगे निर्माण झालेल्या विधायक गोष्टीही फेकून देणे हा 'सेक्युलरिझम' नाही ! जर तसा त्याचा अर्थ असेल, तर 'सेक्युलरिझम' ही संकल्पनाच टाकाऊ आणि वास्तवविरोधी बनेल !
वास्तविक, इस्लामिक बँकींग हा जगभर चालणारा एक बँकींगचा प्रकार आहे. तो प्रकार इस्लामच्या आणि शरीयाच्या Context मध्ये विकसीत झाला, हे खरेच आहे. पण आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी धर्मांच्या Context मध्ये विकसीत झाल्या आहेत. आता म्हणून त्या संकल्पना आणि व्यवस्था फेकून द्यायच्या का ? योग हा हिंदू Contextचा आहे म्हणून नाकारायचा ? सुफी संगीत इस्लामिक आहे म्हणून नाकारायचे ? इतकेच काय तर कायद्यात वापरली जाणारी अनेक Doctrines ही बायबलशी संबंधित म्हणून टाकाऊ मानायची का ? ज्या लोकांना त्यातील 'इस्लामिक' हे नांवच काहीतरी भयानक वाटत आहे, त्यांनी 'योग' आणि 'संगीत' या गोष्टींबाबतही अशीच भूमिका घेण्याचा विचार करायला हरकत नाही ?
आणि महत्त्वाचे म्हणजे, इस्लामिक बँकिंग ही एक पर्यायी अशी व्यवस्था आहे म्हणून स्वीकारली जात आहे, ती 'इस्लामिक' आहे म्हणून नव्हे ! त्यामुळे "आज इस्लामिक केली, उद्या मनुस्मृतीवर आधारित बँकिंग सुरु करणार का ?" हा प्रश्नच चुकीचा ठरतो. आजच्या काळातील Financial Inclusion ला 'इस्लामिक बँकिंग' ही संकल्पना पूरक ठरत असेल, तर फक्त त्याचे नांव 'इस्लामिक' म्हणून ती का नाकारायची ? त्यात करून ही व्यवस्था जगभर यशस्वीरित्या चालत आहे. त्यामुळे भारतात ती लागू करण्यात काहीही गैर नाही.
मात्र हे करताना आवश्यक ते खबरदारीचे उपाय सरकारने आणि आरबीआयने घ्यायलाच हवेत. त्यामुळे इस्लामिक बँकिंगच्या तरतुदी जास्तीत जास्त सेक्युलर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जावेत. विरोध नांवाला असू नये ! मात्र त्याच्या आड काही धार्मिक अपप्रवृत्ती घुसत असतील, तर त्या टाळून पुढे जायला हवे. शरियामध्ये लिहीले आहे तसेच्या तसे न उचलता, आपला 'उद्देश' नेमका ध्यानात ठेवायला हवा.
इस्लामिक बँकिंग स्वीकारले म्हणून ‘जकात' स्वीकारा असे कोणी म्हणू लागले तर ते कटाक्षाने उडवून लावायला हवे.  त्याचबरोबर इस्लामिक बँकिंग हे नांव आणि व्याजमुक्त बँकिंग पद्धती वगळता, इतर प्रचलित ‘शरिया-आधारित' गोष्टी जास्तीत जास्त दूर ठेवाव्यात. मौलवी आणि मुल्ला लोकांना बँकिंगच्या प्रशासनात प्रवेश नसावा. तसेच, गैर-मुस्लीम माणसालाही त्या बँकिंग पर्यायाचा वापर करता यायला हवा. थोडक्यात सांगायचे तर - भर हा 'बँकिंग' वर हवा, 'इस्लामिक' वर नाही ! इस्लामिक बँकिंगचे 'शरबत' विवेकाच्या आणि करड्या सेक्युलर नियमांच्या देखरेखीखाली 'गाळून' मगच जनतेला प्यायला द्यावे !!
अशाप्रकारे ‘इस्लामिक बँकिंग' ही बँकिंग व्यवस्था स्वीकारताना, आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी. मात्र एखाद्या संकल्पनेच्या ऐतिहासिक Context मुळे आणि  नांवामुळे, ती संकल्पना अस्पृश्य आणि टाकाऊ मानणे ठीक नाही. योग, बायबलमधील Doctrines, सुफी संगीत, अनेक खेळ, सांस्कृतिक कला आणि कित्येक वस्तूंची जडणघडण ही कोणत्या ना कोणत्या धर्माशी जोडलेली असतेच. सद्यस्थितीत या सर्व गोष्टी आपण 'सेक्युलर' किंवा धर्माचा विचार न करताच वापरत असतो. त्यामुळे फक्त कोणत्यातरी धर्माशी ऐतिहासिक संलग्नता आहे, म्हणून त्या सर्व गोष्टी आणि संकल्पना टाकाऊ मानणे हा 'धर्मफोबिया' आणि वैचारिक अस्पृश्यतावाद समाजाच्या हिताचा नाही, हे नक्की…

संदर्भ सूची 


Mumbai Tarun Bharat Web Edition -

भारतातील इस्लामिक बँकिंगची दबकी पावले....


Mumbai Tarun Bharat Print Edition -